मुंबई : देशातील यंदाचा उसाचा गळीत हंगाम संपला आहे. उसाची कमी उपलब्धता आणि कमी साखर उताऱ्यामुळे साखर उत्पादनात मोठी घट झाली आहे. १५ मेपर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण साखर उत्पादन सुमारे १८ टक्क्यांनी कमी झाले आहे. मात्र, पुढील गाळप हंगामात उसाची उपलब्ध जास्त असल्यामुळे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, २०२३-२४ मध्ये ३१५.४० लाख टन साखर उत्पादन झाले होते. त्यात ५८ लाख टनांची घट होऊन, चालू हंगामात ते २५७.४० लाख टनांपर्यंत खाली आले आहे. प्रामुख्याने उसाची उपलब्धता घटल्याने आणि सरासरी साखर उतारा घसरल्याने साखर उत्पादनात घट झाली आहे. गतवर्षी १०.१० टक्क्यांवरून या हंगामात ९.३० टक्क्यांपर्यंत साखर उतारा घटला आहे. ऊस गाळपही २७६७.७५ लाख टनापर्यंत घसरले आहे, ते गत वर्षात ३१२२.६१ लाख टन होते. गतवर्षाच्या तुलनेत ५३४.८६ लाख टनांनी गाळप घटले आहे.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या प्रमुख ऊस उत्पादक राज्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत उत्पादनात मोठी घट झाली आहे. महाराष्ट्राचे उत्पादन ११०.२० लाख टनांवरून ८०.९५ लाख टनांवर आले आहे. उत्तर प्रदेशचे उत्पादन १०३.६५ लाख टनांवरून ९२.७५ लाख टनांवर आले आहे. कर्नाटकात ५१.४० लाख टनांवरून ४०.४० लाख टनांवर आले आहे. तामिळनाडू, बिहार आणि आंध्र प्रदेशमध्ये साखर उत्पादन घसरले आहे. तथापि, गुजरात आणि उत्तराखंडमध्ये साखर उत्पादनात सुधारणा झाली आहे. गुजरातचे उत्पादन १०.३० लाख टनांवर गेले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इथेनॉल खरेदी दरात वाढीची मागणी

साखरेचा उत्पादन खर्च ४० रुपये प्रति किलो असून, त्यामुळे किमान साखर विक्री दर किमान ४० रुपये करावा. २०२५-२६ च्या हंगामासाठी इथेनॉलसाठी ५० लाख टन साखर वळवण्याचे लक्ष्य जाहीर करावे. इथेनॉल खरेदीच्या किमतींमध्ये सुधारणा कराव्यात. प्रामुख्याने उसाच्या रसापासून आणि बी – हेवी मोलॅसेसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरात वाढ करावी, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.