मुंबई :मागील काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यातही केरळ व महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या अधिक वाढत आहे. त्यामागे जेएन.१ विषाणूच्या उत्परिवर्तनामुळे तयार झालेले एनबी.१.८.१ आणि एलएफ.७ हे करोनाचे नवीन उपप्रकार कारणीभूत असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही एनबी.१.८.१ या उपप्रकाराबाबत सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार २०२५ च्या सुरुवातीपासून करोनाच्या प्रकारांमध्ये थोडा बदल झाला आहे. एलपी.८.१ हा प्रकार कमी झाला असला तरी एनबी.१.८.१ व एलएफ.७ या उपप्रकाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे या प्रकाराच्या वाढीवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. या दोन्ही उपपक्रारांची संसर्गक्षमता वाढली असली तरी त्यांच्या तीव्रतेत कोणतीही महत्त्वपूर्ण बदल झाला नसल्याने चिंतेची किंवा घाबरण्याची आवश्यकता नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. एनबी.१.८.१ या करोनाच्या उपप्रकाराच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. ही वाढ प्रामुख्याने पूर्व भूमध्यसागरीय, आग्नेय आशिया, पश्चिम पॅसिफिकच्या प्रदेशांमध्ये दिसून येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार करोना चाचण्यांपैकी बाधित येण्याचा दर ११ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. हा दर जुलै २०२४ नंतरचा सर्वाधिक आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेकडून या विषाणूच्या उत्परिवर्तनाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

केरळ आणि महाराष्ट्रात करोना रुग्णांच्या संख्येमध्ये सर्वाधिक वाढ होत असून दिल्ली, गुजरात, कर्नाटक, हरियाणा आणि आता अरुणाचल प्रदेशमध्ये रुग्ण सापडले आहेत. एनएफ.७ हा उपप्रकार मुख्यतः भारताच्या दक्षिणेकडील भागात आढळून येत आहे. एनबी.१.८.१ आणि एनएफ.७ हे दोन्ही उपप्रकार मोठ्या प्रमाणात महानगरांमध्ये आढळून येत आहेत. त्यामुळे ज्या भागात संक्रमणाचे प्रमाण जास्त आहे त्या भागात लसीकरण, मुखपट्टीचा वापर आणि चाचणी या प्रतिबंधात्मक उपायांवर डॉक्टरांकडून भर देण्यात येत आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात असून घाबरण्याची गरज नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

सध्या करोनाची लक्षणे काय आहेत

जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या अहवालांनुसार एनबी.१.८.१ हा उपप्रकार कमी जोखीमेचा आहे. त्यानुसार सध्या भारतात आढळलेल्या करोनाच्या उपप्रकाराची लक्षणे सौम्य आणि सूक्ष्म आहेत. घसा खवखवणे, थकवा, सौम्य खोकला, ताप, स्नायू दुखणे, नाक बंद होणे, कमी दर्जाचे हायपरथर्मिया, डोकेदुखी, मळमळ आणि जठरांत्रांच्या समस्या अशी काही सामान्य लक्षणे ओळखली दिसत आहेत. ही लक्षणे ३ ते ४ दिवसांपेक्षा जास्त काळ टिकून राहिली तर डॉक्टरांकडून रॅपिड अँटीजेन होम टेस्ट किंवा आरटीपीसीआर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अतिरिक्त खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. आतापर्यंत महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि केरळमध्ये ७ मृत्यूची नोंद झाली आहे.

भारतात करोनाच्या दोन लाटा आल्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतामध्ये मार्च २०२० पासून करोनाची साथ सुरू झाली. त्यानंतर देशात करोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. या दोन लाटांमध्ये भारतात ५ लाखांहून अधिक नागरिकांचा बळी गेला. सर्व उद्योग पूर्णपणे ठप्प झाले. व्यवसाय बंद पडल्याने हा काळ सर्वांसाठी आव्हानात्मक होता.