मुंबई : नैऋत्य मोसमी वारे एकाच जागेवर स्थिरावल्याने मोसमी पावसाचा जोर कमी झाला आहे. यामुळे अधूनमधून काही भागात हलक्या सरी बरसत आहेत. दरम्यान, घाटमाथ्यावर शनिवारी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर, मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मोसमी वाऱ्यांनी शुक्रवारीही वाटचाल केलेली नाही. याचाच परिणाम म्हणून सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. काही भागात हलक्या ते मध्यम, तर काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानुसार शनिवारी घाटमाथ्यावर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुणे, सातारा, सांगली या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहेत. तर सोलापूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या कालावधीत ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील. उर्वरित भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, तर कोकण आणि विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर पुढील आठवड्यात पूर्व विदर्भ आणि कोकणचा काही भाग सोडला तर राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
या आठवड्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्यासाठी वातावरण अनुकूल असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यानंतरच्या आठवड्यात (२० ते २६ जून) दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण व विदर्भातील काही भाग सोडला तर इतर ठिकाणी चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर २७ जून ते ३ जुलै या कालावधीत पश्चिम महाराष्ट्र व कोकण वगळता इतर ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कोकण वगळता इतर भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत कोकणात पावसाचा फारसा जोर नसेल. मात्र, इतर भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसाने जूनच्या सुरुवातीपासून उघडीप दिली आहे. काही भागात हलक्या सारींचा अंदाज आहे. मात्र मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल आठवडाभरापासून मंदावली आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा ते पश्चिम बंगालपर्यंत मोसमी वारे दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रगती केलेली नाही. अरबी समुद्रातून २६ मेपासून, तर बांगालच्या उपसागरातून २९ मेपासून मोसमी वारे पुढे सरकलेले नाहीत. मोसमी वाऱ्यांची सीमा शुक्रवारीही मुंबई, अहिल्यानगर, अदिलाबाद, पूरी आणि पूर्व भारतातील बालूरघाटपर्यंत कायम होती.
ब्रम्हपुरी येथे सर्वाधिक तापमानाची नोंद
सध्या मोसमी पावसाचे जोर ओसरल्यामुळे राज्यात उन्हाचा तडाखा आणि उकाडा सहन करावा लागत आहे. यामुळे तापमानातही सतत चढ-उतार सुरू आहेत. ब्रम्हपुरी येथे शुक्रवारी ४२.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल नागपूर येथे ४१.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. दरम्यान, मुंबईतही मागील काही दिवसांपासून तापमानात चढ- उतार सुरू आहेत. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३२.२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३१.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी सांताक्रूझ येथील तापमानात घट झाली होती.