मुंबई: उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे धाराशिव रेल्वे स्थानक असे नामकरण करण्यासाठी मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) ३१ मे रोजी रात्री ११.४५ वाजल्यापासून मध्यरात्री १.३० पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
शासनाने सोलापूर विभागातील प्रसिद्ध असलेल्या उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘धाराशिव’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने याबाबतची अधिसूचना २५ एप्रिल २०२५ रोजी प्रसिद्ध केली. केंद्रीय रेल्वे प्रशासनाने त्याला मान्यता देऊन, रेल्वे स्थानकाच्या नावातील हा बदल केवळ नावापुरताच असून, स्थानकाचा संख्यात्मक कोड ‘०१५२७२४६’ पूर्ववत राहणार आहे.
मात्र, स्थानकाच्या नावासह कोड इनिशियल्समध्ये ‘यूएमडी’ ऐवजी आता ‘डीआरएसव्ही’ असा बदल केला आहे. ‘धाराशिव’ हे नवीन नाव मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये दर्शवले जाणार आहे. त्यामुळे मुंबई प्रवासी आरक्षण प्रणालीमध्ये स्थानकाच्या नावासह कोड इनिशियल्समध्ये बदल केला जाईल. त्यामुळे प्रवासी आरक्षण प्रणाली, कोचिंग रिफंड, इंटरॲक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टम (आयव्हीआरएस), चार्ट डिस्प्ले, तात्काळ आरक्षण, रिफंड काउंटर आणि कोचिंग रिफंड टर्मिनल या सेवा उपलब्ध नसतील.
याशिवाय इंटरनेट ऑनलाइन आरक्षण सुविधा उपलब्ध होणार नाही. तथापि, रिफंड नियमांनुसार परताव्यासाठी तिकीट जमा पावती (टीडीआर) जारी केले जाईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे दिली. तसेच या महत्त्वाच्या देखभालीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले.