लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : उपनगरी रेल्वेमधून पडल्यामुळे गेल्या तीन वर्षांत तब्बल ७ हजार ५६५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनास देण्यात आल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले. खासगी आस्थापनांच्या कामाच्या वेळा बदलण्यासाठी कृतिगट स्थापन करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

मुंब्रा येथे अलिकडेच झालेल्या अपघाताबाबत अतुल भातखळकर,नाना पटोले यांनी संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. लोकलवरील ताण कमी करण्यासाठी मेट्रोचे जाळे वाढविण्यास प्राधान्य दिले जात आहे. मुंबईकरांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी जलवाहतूक, पॉट टॅक्सी (हवेतून चालणाऱ्या टॅक्सी) आणि रोप वे यासारख्या पर्यायी वाहतूक व्यवस्थांचाही विचार सुरू असल्याचे ते म्हणाले. रेल्वे केंद्राच्या अखत्यारीत येत असली, तरी राज्यातील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकार गंभीर आहे. मुंब्रा अपघात ही अतिशय दुर्दैवी घटना होती. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत उपायोजना करणे संदर्भात रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर मुख्य सचिवांनी बैठक घेतली. प्रवाशांची गर्दी कमी करणे, स्थानकांमधील गर्दीचे व्यवस्थापन करणे, प्रवासादरम्यान होणारे मृत्यू टाळणे व स्थानकांच्या सुरक्षेबाबत उपाययोजनांवर रेल्वेला सूचना देण्यात आल्याचे ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या काळात उपनगरी गाडय़ांमध्ये गर्दीची समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकारने मंत्रालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा तसेच सकाळी कार्यालयात उपस्थिती नोंदविण्यासाठी एक तासाची लवचिकतेची सवलत दिली आहे. खाजगी आस्थापनांनीही त्यांच्या कार्यालयीने वेळेत बदल करण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी कृतिगटाची नियुक्ती केली जाईल. – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री