सल्लागाराचा अहवाल एक ते दोन महिन्यात
मुंबई : रेल्वे, मेट्रो मोनो, बेस्ट आदींमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना एकाच तिकीटाचा पर्याय उपलब्ध करण्यासाठी ‘एकात्मिक तिकीट प्रणाली’ची अंमलबजावणी करण्यात येणार असून पुढील वर्षापासून मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकात ही प्रणाली सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. एमआरव्हीसीने या प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी सल्लागाराची नियुक्ती केला असून त्यांचा अहवाल दोन महिन्यात सादर होईल. त्यानंतर निविदा प्रक्रियेसाठी साधारण तीन – चार महिने लागतील. निविदा प्रक्रेयेअंती कंपनीला या कामाची जबाबदारी दिल्यानंतर टप्प्याटप्प्याने या प्रणालीची अंमलबजावणी होईल, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.
रेल्वे, मेट्रो, मोनो, बेस्ट व इतर सार्वजनिक परिवहन उपक्रमांसाठी एकच तिकीट असावे यासाठी ‘एकात्मिक तिकीट प्रणाली’ची योजना आखण्यात आली होती. प्रवासाचा वेळ, खर्च वाचावा तसेच लवकरात लवकर इच्छित स्थळी पोहोचण्याचे मार्ग, स्थानकांमधून बाहेर पडल्यास दळणवळणाचे पर्याय उपलब्ध व्हावेत यासाठी ‘एकात्मिक तिकीट प्रणाली’ प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणारी आहे. बेस्ट उपक्रमाने अलिकडेच एकात्मिक तिकीट प्रणालीची अंमलबजावणी केली असून यासाठी प्रवाशांना कार्डही वाटप करण्यात आले. परंतु रेल्वे, मेट्रोत किंवा अन्य परिवहन सेवांमध्ये ही यंत्रणा उपलब्ध नसल्याने बेस्टच्या या सेवेला अल्प प्रतिसाद मिळत आहे. या सेवेची अंमलबजावणी पश्चिम आणि मध्य उपनगरीय रेल्वेतही करण्यात येणार आहे. त्यासाठी एमआरव्हीसीने साधारण अडीच महिन्यांपूर्वी तांत्रिक आणि आर्थिक सल्लागाराची नियुक्ती केली होती. मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वेचा अवाका मोठा आहे. त्यामुळे या प्रणालीची अंमलबजावणी करताना बराच कालावधीही लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या योजनेनुसार रेल्वे स्थानकातील सर्व प्रवेशद्वारांवर कार्ड रीडर बसविण्यात येणार आहेत. प्रवास करणाऱ्यांना कार्ड रीडरवर कार्ड टॅप करावे लागेल, केलेल्या प्रवासानुसार कार्डमधून पैसे वजा होतील आणि तिकीट तयार उपलब्ध होईल. तिकिटाची तपासणी करण्यासाठी तिकीट तपासनीसांना उपकरणे देण्यात येतील.
सल्लागार कंपनीचा अहवाल, निविदा प्रक्रियेला लागणारा वेळ लक्षात घेता या योजनेची अंमलबजावणी पुढील वर्षापासूनच टप्प्याटप्याने विविध स्थानकात करण्यात येईल. स्थानके आणि त्यासाठी उपलब्ध केली जाणारी यंत्रणा व्यापक असल्याने त्यासाठी अवधी लागेल, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.