मुंबई : ‘युती होण्यापूर्वी ह्याला भेटायचे नाही त्याला भेटायचे नाही’, अशा अटी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना घातल्या होत्या. त्याला न जुमानता राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीने राज ठाकरे हे स्वाभिमानी नेते असून ते अशा काही अटींना जुमानत नाहीत हे स्पष्ट झाले, असा टोला शिवसेना (शिंदे) नेते, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लगावला.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे पडघम वाजू लागले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे व शिवसेना ठाकरे पक्षाची युती व्हावी यासाठी नेते व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. राज ठाकरे यांनी एका संवाद कार्यक्रमात या चर्चेला चालना दिली. गेली दोन महिने अनेक पातळीवर ही चर्चा सुरु आहे. राज ठाकरे यांच्या संवाद कार्यक्रमानंतर उध्दव ठाकरे यांनी एकत्र येताना राज ठाकरे यांनी तळ्यात मळ्यात करु नये अशी अपेक्षा व्यक्त केली होती. गुरुवारी झालेल्या फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतर उदय सामंत यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली.
शाळेत लहान मुले ह्याच्याशी बोलू नकोस, त्याच्याशी बोलू नको अशा अटी घालतात. शाळेत हे चालते पण राजकारणात नाही. उध्दव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी संवाद ठेवू नये अशी अट घातली होती. त्याला जुमानणारे राज ठाकरे नाहीत हे त्यांनी मुख्यमंत्री भेटीनंतर दाखवून दिले. राज ठाकरे महायुती बरोबर आल्यास महायुतीची ताकद वाढणार आहे. महायुतीतील मनसेच्या सहभागाचा निर्णय हे महायुतीचे तीन नेते घेणार असल्याचे सुतोवाच सामंत यांनी केले.