अण्णा द्रमुकच्या नाराजीनंतर सेनेची मते निर्णायक

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत आधीच २० हजार मते भाजपकडे कमी असताना, अण्णा द्रमुकच्या नाराजीच्या पाश्र्वभूमीवर सुमारे २५ हजार मूल्य असलेली शिवसेनेची मते भाजपसाठी महत्त्वाची ठरणार आहेत.

जुलैच्या सुरुवातीला होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. या आठवडय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मित्रपक्षांच्या नेत्यांची बैठक बोलाविली आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या नेत्यांनी ‘मातोश्री’वर यावे, असा सूर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लावला आहे.

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या यशानंतर भाजपच्या मतांमध्ये वाढ झाली. तरीही विजयासाठी २० हजार मतांचे मूल्य कमी पडत आहे. अण्णा द्रमुक किंवा बिजू जनता दलाला बरोबर घेऊन मतांचे गणित जुळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तामिळनाडूतील राजकीय घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर सत्ताधारी अण्णा द्रमुकच्या पाठिंब्याबाबत भाजपमध्ये काहीशी धाकधूक आहे. भाजप नेत्यांच्या सूचनेवरूनच तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शशिकला यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यास विलंब लावला होता. तसेच माजी मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांना भाजपने ताकद दिली. अण्णा द्रमुकमध्ये फूट पाडण्याचे अजूनही भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. या साऱ्या घडामोडींमुळे अण्णा द्रमुकचे नेते भाजपवर नाराज आहेत. ओडिशामध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी बिजू जनता दलाला भाजपने आव्हान दिले. पुढील विधानसभा निवडणुकीत भाजप सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे हातचे राखून मदतीबाबत निर्णय घेऊ शकतात. अशा परिस्थितीत २५ हजार मतांचे मूल्य असलेल्या शिवसेनेची मते भाजपकरिता निर्णायक ठरू शकतात. आधीच २० हजार मूल्य असलेली मते कमी पडत असताना शिवसेनेने वेगळी वाट पत्करल्यास २५ हजार मूल्य असलेल्या मतांचा खड्डा पडू शकतो.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीत  भाजपपाठोपाठ तेलगू देशमकडे जास्त मते आहेत. चंद्राबाबू नायडू यांच्यामुळे तेलगू देशम तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा पक्षही भाजपला पाठिंबा देईल. पंजाबमधील दारुण पराभवामुळे अकाली दलाची मते नगण्य झाली आहेत. त्यामुळे सेनेची मते भाजपसाठी महत्त्वाची ठरली आहेत.

शिवसेनेच्या मतांचे मूल्य

  • लोकसभेचे १८ आणि राज्यसभेचे तीन खासदार – एकूण २१
  • संसद सदस्याच्या एका मताचे मूल्य ७०८ ७ २१ = १४,८६८
  • विधानसभा सदस्य – ६३ (विधान परिषद सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो.)
  • महाराष्ट्रातील आमदारांच्या एका मताचे मूल्य – १७५
  • १७५ ७ ६३ = ११,०२५
  • संसद सदस्य आणि विधानसभा आमदारांचे एकूण मतांचे मूल्य – २५ हजार ८९३.

प्रतिभाताईंनी ‘मातोश्री’वर जाण्याचे टाळले होते

राष्ट्रपतिपदाच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेने मित्रपक्ष भाजपऐवजी काँग्रेसला मतदान केले आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळी प्रणब मुखर्जी हे मतांसाठी ‘मातोश्री’वर गेले होते. पण २००७ मध्ये प्रतिभाताई पाटील यांनी शिवसेनाप्रमुखांची भेट घेण्यासाठी जाण्याचे टाळले होते. काँग्रेस नेतृत्वाने प्रतिभाताईंची मुंबई भेटच प्रचारकाळात रद्द केली होती.