मुंबई-ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यास मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही आणि मुंबई-महाराष्ट्राकडे पैसाच उरणार नाही, असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्याने राज्यभर त्याचे तीव्र पडसाद उमटले. हे प्रकरण ताजं असतानाच आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रादेशिक पक्षांसंदर्भात केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. राज्यपालांनी केलेलं विधान आणि जेपी नड्डांच्या विधानामधून स्थानिक अस्मिता संपवण्याचा भाजपाचा डाव जनतेसमोर आल्याचा दावा उद्धव यांनी ‘मातोश्री’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

नक्की वाचा >> नड्डांच्या ‘शिवसेना संपत आलेला पक्ष’वर सोमय्या म्हणतात, “उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे कुठे? किती आमदार, खासदार…”

राज्यपालांवर टीका
“राज्यपालांचं जे विधान आहे ते फार घातक आहे आणि गंभीर आहे,” असं उद्धव यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलंय. जे. पी. नड्डा यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी प्रादेशिक पक्षांची एकजूट असावी हा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे, असं वाटतं का यासंदर्भात उद्धव यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर उत्तर देताना उद्धव यांनी, “प्रादेशिक पक्षाची एकजूट हा पुढचा टप्पा झाला. पण प्रादेशिक पक्ष संपवण्याचं भाजपाचं कारस्थान आहे. त्याची सुरुवात कोश्यारींच्या वक्तव्यातून झालेली आहे,” असं म्हटलं. यावेळेस उद्धव यांनी आपण जाणीवपूर्वकपणे राज्यपाल हा उल्लेख टाळल्याचं नमूद केलं.

नक्की वाचा >> “राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केल्याच्या वक्तव्यावर पाणी ओतण्यासाठी…”; राऊतांविरोधातील कारवाईचा उल्लेख करत सेनेचा भाजपावर हल्लाबोल

नड्डांच्या वक्तव्यावरुनही भाजपावर निशाणा
“आज नड्डा जे म्हणालेत हे पक्ष संपतील. म्हणजे प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकायची हिंदूंमध्ये फूट पाडायची, भाषिक भिंती उभ्या करायच्या. स्थानिक अस्मिता चिरडायची. मराठी माणसाला चिरडून टाकायचं आणि पुन्हा मराठी, अमराठी असं राजकारण करायचं. स्वत:च्या राजकारणाच्या तुंबड्या भरुन घ्यायच्या. आपले विरोधक कोणी असतील तर त्यांना संपवायचं. असं हे भाजपाचं कारस्थान अत्यंत निष्ठुरपणे जनतेसमोर आलेलं आहे,” असं उद्धव यांनी भाजपावर टीका करताना म्हटलंय.

पाहा व्हिडीओ –

नक्की वाचा >> “राऊत असो, शरद पवार असो की उद्धव ठाकरे असो, सर्वांनी…”; राऊतांनंतर ‘हा’ नेता तुरुंगात जाणार असल्याचा किरीट सोमय्यांचा दावा

नड्डा नेमकं काय आणि कधी म्हणाले?
जे पी नड्डा बिहारमध्ये भाजपाच्या १४ जिल्हा कार्यालयांचं उद्घाटन करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी बोलताना त्यांनी इतर प्रादेशिक पक्षांसंदर्भात विधान केलं. जे पी नड्डा म्हणाले “भाजपाच्या विरोधात लढणारा एकही राष्ट्रीय पक्ष आज शिल्लक राहिलेला नाही. आपली खरी लढाई कुटुंबवाद आणि घराणेशाहीविरोधात आहे”. विचारधारेवर चालणारा एकमेव पक्ष असल्याने फक्त भाजपाच राहणार असा दावाही यावेळी त्यांनी केला.

नक्की वाचा >> राऊतांच्या घरातील नोटांवर मुख्यमंत्री शिंदेचं नाव असल्यावरुन प्रश्न विचारला असता किरीट सोमय्या हसत म्हणाले, “मी…”

जे पी नड्डा यांनी यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससोबत लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता पक्ष, समाजवादी पक्ष, बिजू जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती अशा अनेक पक्षांचा उल्लेख केला. “तामिळनाडूत घराणेशाही, शिवसेना जो संपत आलेला पक्ष आहे, तिथेही हेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही घराणेशाही आहे. काँग्रेस तर आता भाऊ-बहिणीचा पक्ष झाला आहे,” असं नड्डा आपल्या भाषणात म्हणाले.