मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत सोमवारी संपणार आहे. सध्या पक्षनाव आणि निवडणूक चिन्हाचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात असल्यामुळे तेथील निर्णय आल्यानंतर पुढील रणनीती ठरविण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांची २०१८ मध्ये पक्षप्रमुखपदी निवड झाली. ही सोमवारी संपत आहे. दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेना कोणाची, हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगापुढे गेला आहे. यावर ३० जानेवारी सुनावणी आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी आयोगाचा निर्णय होऊ शकतो. याबाबत खासदार अनिल देसाई म्हणाले, की ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदासाठी मुदतवाढ द्यावी आणि पक्षांतर्गत निवडणुका घेऊ द्याव्यात, अशी मागणी आम्ही आयोगाकडे केली आहे. त्यावर त्यांनी निर्णय दिलेला नाही. सोमवारी मुदत संपत असल्याची बाब तांत्रिक आहे. आयोगाच्या निर्णयानंतर पुढील दिशा ठरविली जाईल. आयोगाचा निर्णय काहीही झाला, तरी उद्धव ठाकरे हेच आमचे पक्षप्रमुख आहेत, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अ‍ॅड. अनिल परब यांनी ठणकावले.

शिंदे गटाने ठाकरे यांची पक्षप्रमुखपदी झालेली निवड बेकायदा असल्याचा दावा केला आहे. मात्र याच पद्धतीने शिंदे यांचीही प्रमुख नेतेपदी निवड झाली आहे. हे पद पक्षाच्या घटनेत अस्तित्वातच नाही, असा मुद्दा ठाकरे गटाने मांडला आहे. निवडणूक आयोगाने आमदार-खासदारांचे संख्याबळ लक्षात घेताना विधान परिषद, राज्यसभा सदस्यांनाही विचारात घ्यावे, असा युक्तिवादही ठाकरे गटाने केला आहे. कायदेशीर भक्कमपणे मांडल्यामुळे आपल्या बाजूने निर्णय होईल, अशी ठाकरे गटाला आशा आहे. मात्र आयोगाने विरोधात निर्णय दिल्यास न्यायालयात दाद मागण्याची तयारी ठेवली असल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणनीती काय?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी ठाकरे गटाचा षण्मुखानंद सभागृहात मेळावा होणार आहे. या वेळी भाजप आणि शिंदे गटाविरोधातील लढाई आणखी तीव्र करण्याबाबत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार असल्याचे ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीशी युती करण्याबाबत चर्चा सुरू केली आहे. याबाबतही काही दिशा स्पष्ट होण्याची शक्यता असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले.