मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत शुक्रवारी ७९.२५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. पाणीसाठा वाढलेला असल्यामुळे पाणी कपात रद्द करण्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांत ११ लाख ४७ हजार ८६ दशलक्ष लिटर पाणी साठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा एकूण साठवण क्षमतेच्या ७९.२५ टक्के आहे. पाणीसाठा वाढला असला तरी सध्या लागू असलेली पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने अद्याप जाहीर केलेला नाही. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाणीसाठ्याचा आढावा घेऊन कपात रद्द करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले होते. त्यानुसार लवकरच कपात रद्द होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> मुंबई-गोवा महामार्गाची भीषण अवस्था! युट्युबर जीवन कदमने दाखवलं सत्य, म्हणाला, “गाडीचा टायर भररस्त्यात…”

मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी ही चार धरणे ओसंडून वाहू लागल्यामुळे व मध्य वैतरणा धरण ९६ टक्के भरल्यामुळे पाणी कपात रद्द करण्याची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आढावा घेऊन पाणी कपात रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार होता. आता पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणांमधून सर्वात जास्त पाणीपुरवठा करण्यात येत असून या धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. भातसा धरणात ७२ टक्के, तर ऊर्ध्व वैतरणा धरणात ५९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. धरणक्षेत्रात तुरळक पाऊस पडत असला तरी जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यामुळे पाणी पातळी वाढत आहे.

हेही वाचा >>> मुंबईत ‘बेस्ट’चे कामबंद आंदोलन; मनसेचा थेट सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, “तुमची ट्रिपल शक्ती…”

उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांतून मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो.  सातही धरणांतील पाणीसाठा १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटरवर पोहोचल्यानंतर मुंबईकरांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य होते. सध्या पाणीसाठ्यात २० टक्के तूट आहे.

दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा

४ ऑगस्ट २०२३….. ११ लाख ४७ हजार ०८६ दशलक्ष लिटर….. ७९.२५ टक्के

४ ऑगस्ट २०२२……  १२ लाख ८८ हजार ५२४  दशलक्ष लिटर…… ८९.०३ टक्के

४ ऑगस्ट २०२१…… ११ लाख ३७ हजार ५४३ दशलक्ष लिटर……. ७८.५९  टक्के

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water levels in mumbai s seven lakes increase to 79 percent mumbai print news zws
First published on: 04-08-2023 at 13:59 IST