मुंबई : राज्यात आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांच्या प्रभाग रचनेची सात टप्प्यांतील प्रक्रिया पार करण्याकरिता अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण होण्यासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर उजाडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
प्रभाग रचनेचे अधिकार हे राज्य निवडणूक आयोगाकडे होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात जानेवारी २०२२ मध्ये हे अधिकार राज्य सरकारने स्वत:कडे घेतले होते. प्रभागांची संख्या, बहुसदस्यीय प्रभागांची रचना, नगराध्यक्ष निवडणुका आदी ठाकरे सरकारच्या काळातील अनेक निर्णय महायुती सरकारने सत्तेत आल्यावर बदलले. परंतु प्रभागांची रचना करण्याचा अधिकार सरकारने स्वत:कडे घेण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय महायुतीने सरकारने कायम ठेवला. या अधिकारात राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने सर्व महापालिका आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांना प्रभागांची रचना करण्याचा आदेश दिला आहे. ही सारी प्रक्रिया सप्टेंबरच्या सुरुवातीस पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सप्टेंबरपर्यंत का अशक्य?

● सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात दिलेल्या आदेशानुसार चार महिन्यांत म्हणजे सप्टेंबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया पार पाडायची आहे. परंतु सप्टेंबरपर्यंत महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया पार पडणे अशक्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला मुदत वाढवून देण्यासाठी अर्ज करण्याची मुभा दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या गट आणि गणांची रचना नव्याने करावी लागणार आहे. सप्टेंबरमध्ये पडणारा पाऊस, प्रभागांच्या रचनेस लागणारा वेळ हे सारे लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडण्यासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिना उजाडेल, असे चित्र आहे