मुंबई : एकीकडे राज्य सरकार सर्वसामान्य नागरिकांनी विद्युत वाहने खरेदी करण्यास प्राधान्य देण्यासाठी नवनवीन योजना, सवलती अंमलात आणत आहे. अटल सेतू, मुंबई-पुणे, समृद्धी महामार्गावर विद्युत वाहनांना १०० टक्के पथकर माफी देण्यात आली आहे. तर, दुसरीकडे इव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून विद्युत बसचा एसटी महामंडळाला पुरवठा केला जात नाही. त्यामुळे ५,१५० विद्युत बसचा करार रद्द करण्याच्या सूचना परिवहन मंत्र्यांना दोन महिन्यांत दुसऱ्यांदा करावी लागली लागली आहे. या घडामोडीमुळे राज्यात पर्यावरण पूरक विद्युत बस पुरवठा करणे अवघड झाले आहे. तसेच पाच हजार विद्युत एसटी राज्यात धावण्याचे स्वप्न भंग होण्याची शक्यता आहे.

पर्यावरणपूरक आणि किफायतशीर दरामध्ये धावणाऱ्या विद्युत बसचे लोकार्पण फेब्रुवारी २०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर एसटी महामंडळाने ५,१५० वातानुकूलित इ-बस घेण्याचा निर्णय घेतला होता. इव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड या पुरवठादार कंपनीने मार्च २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत एसटीला नऊ मीटर लांबीच्या १३८ व १२ मीटर लांबीच्या ८२ अशा एकूण २२० बस पुरविल्या. दरम्यानच्या काळात एसटी महामंडळाने इव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी २५ हून अधिक वेळा पत्रव्यवहार आणि बैठका घेऊन बसचा पुरवठा करण्याबाबत सूचना केल्या होत्या. नोव्हेंबर २०२३ च्या करारानुसार एसटीच्या ताफ्यात ४ हजार बस येणे अपेक्षित होते. तर, नवीन वेळापत्रकानुसार २२ मे २०२५ पर्यंत १,२८७ बस पुरविण्यात याव्यात, असे इशारा पत्र देण्यात आले होते. मात्र मुदत संपल्यानंतरही बसच्या पुरवठ्यात कोणतीही प्रगती झालेली नाही. त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी २६ मे २०२५ रोजी भाडेतत्त्वावरील विद्युत बस करार रद्द करण्याच्या सूचना एसटी महामंडळाला दिल्या.

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ५,१५० भाडेतत्त्वावरील विद्युत बसपुरवठा करणारी संबंधित कंपनी निष्क्रिय ठरली. या कंपनीसोबत एसटी महामंडळाने केलेला निविदा करार रद्द करण्याबाबत कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत. भविष्यात या संस्थेकडून बस पुरवठा करण्याबाबत साशंकता आहे. सध्या महामंडळाला बसची अत्यंत आवश्यकता आहे. संबंधित संस्था जर वेळेत बसचा पुरवठा करू शकत नसेल तर त्यांच्यासोबत केलेला निविदा करार रद्द करावा. – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करार रद्द करण्याची एप्रिल २०२५ मध्येही सूचना

भाडेतत्त्वावरील विद्युत बस पुरवणाऱ्या संस्थेचा करार रद्द करण्याच्या सूचना प्रताप सरनाईक ३ एप्रिल २०२५ रोजी दिल्या होत्या. बस पुरवठादार कंपनीला अंतिम नोटीस पाठविण्याच्या सूचना परिवहन मंत्र्यांनी दिल्या होत्या. तसेच सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास करार रद्द करण्याची कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

वारंवार इशारा पत्र पाठवूनही कारवाई नाही

कराराचा भंग करणाऱ्या कंपनीचे कंत्राट अद्यापपर्यंत रद्द करण्यात आलेले नाही. वारंवार इशारा पत्र पाठवून कंपनीला गोंजाण्यात आले. नवीन सुधारित वेळापत्रक पाठवून बस पुरवण्याचे इशारा पत्र देण्यात आले. परंतु, मुदत संपल्यानंतर एकही बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेली नाही. यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, प्रवाशांना अपुऱ्या बस सेवेचा सामना करावा लागेल. – श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस</p>