भाईंदर येथली उत्तन परिसरात तटरक्षक दलाने ताब्यात घेतलेल्या जलराणी बोटीप्रकरणी अखेर मुंबईच्या यलोगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ओएनजीसीच्या प्रतिबंधीत क्षेत्रात प्रवेश करणे व पाकिस्तानी खलाशांबाबत खोटी माहिती दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

ओएनजीसीचे अधिकारी पियुष कुमार सिंह (४०) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.  ओएनजीसीच्या प्रतिबंधीत क्षेत्रात शनिवारी ही बोट शिरली होती. त्यांनी भारतीय नौसेनेच्या गस्त नौकेने दिलेले आदेश पाळले नाहीत. तसेच बोटीच्या तांडेलला ताब्यात घेऊन चौकशी केली असता बोटीवरील दोन खलाश्यानी पाकिस्तानी असल्याची खोटी माहिती देऊन सुरक्षा यंत्रणांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी बोटीचा तांडेल व १४ खलाश्यांविरोधात मुंबईतील यलोगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखळ करण्यात आला. भादंवि कलम १८८, १८२, १७९ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> मुंबई : क्षयरोग रुग्णालयात लहान मुलांसाठी विशेष कक्ष

मुंबई आणि पालघर किनारपट्टी पासून ४४ नौटीकल मैलावर शनिवारी दुपारी तटरक्षक दलाने एक बोट ताब्यात घेतली होती. या बोटीत पाकिस्तानी नागरिक असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. बोटीत पाकिस्तानी नागरिक असल्याच्या अफवेमुळे खळबळ उडाली होती. मात्र अधिक तपासात ही बोट भाईंदरच्या उत्तन येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘जलराणी’ असे या मच्छिमार बोटीचे नाव असून ती उत्तनच्या बेन्हार जॉनी बुटी यांच्या मालकीची आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या या बोटीत बोटीचे मालक, त्यांचा मुलगा आणि १३ खलाशी आहेत. यातील ४ खालशी झारखंडचे तर उर्वरित ५ जण छत्तीसगडचे आहेत. सर्व खलाश्यांची आणि बोटीची कागदोपत्री माहिती तपासल्यानंतर त्यांना पुन्हा उत्तन येथे जाण्याच्या सूचना तटरक्षक दलाकडून देण्यात आल्या होत्या.