मुंबई : दुबईमधील जहाजावरील नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन तरूणांना ईराणमध्ये मजुरी करायला भाग पाडल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी अंधेरी येथील शिंपिंग कंपनीतील तिघांविरोधात अंबोली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंधेरी (पश्चिम) येथे क्रिस्टल शिपिंग मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. अंधेरीत राहणाऱ्या रामेश्वर गुप्ता (२५) याने या कंपनीत जहाजावरील नोकरीसाठी अर्ज दिला होता. गुप्ताला २१ सप्टेंबर २०२४ रोजी कंपनीत मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. तेथे सोहेल नावाचा एक तरुण त्याला भेटला. त्याने गुप्ताची कॅप्टन मोहीत चौहान नामक व्यक्तीची ओळख करून दिली. मोहीत चौहानने दुबई येथील जहाजावर मासिक ५६ हजार रुपयांची नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन त्याला दिले. त्यासाठी ५ लाख रुपये भरावे लागतील, असेही त्याने सांगितले.
त्यानुसार गुप्ताने ५० हजार रुपये रोख वैद्यकीय चाचणीसाठी दिले. यानंतर गुप्ताची काही कागदपत्रांवर स्वाक्षरी घेण्यात आली. पुढील प्रकियेनंतर त्याने साडेचार लाख रुपये भरले. त्यानंतर २० दिवसांत जहजावर रुजू केले जाईल, असे त्याला सांगण्यात आले.
गुप्ताला १७ डिसेंबर २०२४ रोजी दुबईतील शारजा येथे पर्यटक व्हिसावर पाठविण्यात आले. मात्र तेथे पोहोचल्यावर त्याला जहाजावर न पाठवता एका गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले. त्या ठिकाणी अन्य १० ते १२ भारतीय तरूण होते. काही दिवसांनी त्यांना इराण येथे पाठवण्यात आले. गुप्ताला तेथे यश चौहान (२२) नावाचा तरुण भेटला. त्याचीही अशाच प्रकारे फसवणूक करण्यात आली होती. ईराणमध्ये या तरुणांना मजुरी करायला भाग पाडण्यात आले. या दोघांनी मजुरीचे काम करण्यास नकार दिला.
त्यानंतर एक दलालाच्या माध्यमातून ते दोघे इराणच्या सिराज विमानतळावर आले. त्यांनी आपल्याला भारतात पाठवण्याची विनंती एका दलालाला केली. दलालाने या तरुणांना क्रिस्टल शिप कंपनीविरोधात कसलीही तक्रार करणार नाही, अशी एक चित्रफित तयार करून घेतली. यानंतर गुप्ताने भारतात आपल्या कुटुंबियांबरोबर संपर्क साधून पैसे मागवून घेतले आणि विमानाचे तिकिट काढून तो भारतात परतला.
तक्रार केल्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी
रामेश्वर गुप्ता आणि यश चौहान यांनी मुंबईत आल्यावर क्रिस्टल शिप मॅनेजमेंट कंपनीला या फसवणुकीबाबत जाब विचारला. तेव्हा आमच्याविरोधात तक्रार केली तर मुलींची छेड काढल्याचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी धमकी आरोपी मोहीत चौहानने त्यांना दिली. या कंपनीने फसवणूक केलेले आणखी दोन तरुण त्यांना भेटले. या चौघांची एकूण साडेदहा लाख रुपयांची फवसणूक करण्यात आली होती. अखेर या चौघांनी याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार केली. अंबोली पोलिसांनी याप्रकरणी सोहेल, मोहीत चौहान आणि सिराज नावाच्या व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३५१ (२), ३५२ आणि ६१ अन्वये गुन्हे दाखल केला.