नीरीच्या संशोधनाचा हजारो नागरिकांना लाभ होणार

पाणी शुद्ध करण्यासाठी जगभरात विविध तंत्रज्ञान उपलब्ध आहेत. मात्र जेथे पूर परिस्थिती उद्भवते किंवा भूजलातूनही गढूळ पाणी येते तेथे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. अशा ठिकाणी सहज शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थेने (नीरी) निरी झर वॉटर फिल्टर विकसित केले आहे. त्याचा लाभ पूरग्रस्त भागातील हजारो नागरिकांना होत आहे.

शहराबाहेरील वस्त्या, छोटी खेडी अशा ठिकाणी नेहमी अशुद्ध पाण्याची समस्या असते. तसेच एखाद्या ठिकाणी पूरपरिस्थिती उद्भवल्यास चोहीकडे पाणीच पाणी असते.  पिण्यायोग्य पाणी मिळत नाही. यावर मात करण्यासाठी नीरीने अगदी सोप्या पद्धतीचे वॉटर फिल्टर विकसित केले आहे. विशेष म्हणजे, याचे स्वामित्व हक्कदेखील मिळवले आहे. नीरीच्या संशोधकांच्या चमूने सुरुवातीला दोन तीन प्रकारचे वॉटर फिल्टर विकसित केले. यामधून नीरी झर सर्वात यशस्वी ठरले. हे फिल्टर एकावेळी पूर्ण कुटुंबाला पुरेल इतके अर्थात २२ लिटर पाणी शुद्ध करते. स्वयंपाकासाठी किंवा पिण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो. हे वॉटर फिल्टर स्टील भांडय़ाच्या दोन भागात तयार करण्यात आले असून वरील भागाला तळाशी दोन छिद्र तयार करण्यात आले आहे. त्यावर एका बारीक जाळीच्या पिशवीमध्ये पाच सेंटिमीटपर्यंत वाळू टाकण्यात आली आहे.  खालच्या भागात वरील टाकण्यात आलेले गढूळ पाणी शुद्ध होऊन गोळा होते. त्याला समोरील भागात तोटी देखील लावण्यात आली आहे. वरील भागात अशुद्ध पाणी टाकताच त्यामध्ये दोन चार थेंब क्लोरिन टाकले की २० मिनिटात गढूळ पाणी पिण्यायोग्य होते. पूरपरिस्थितीत नीरीतर्फे अडीच हजार नीरी झर वॉटर फिल्टर मोफत वाटण्यात आले. कर्नाटक, बेळगांव येथे नीरीच्या चमूने जाऊन नागरिकांच्या याबद्दलचे फायदे आणि कशाप्रकारे नीरी झर वापरायचे, याची माहिती दिली. त्याशिवाय दर सहा-आठ महिन्यांत चमू जाऊन त्याची पाहिणी देखील करते. कोल्हापूरला आलेल्या महापुराच्या वेळीही नीरी झरचे वाटप करण्यात आले.