दुसऱ्या लाटेत पहिल्यांदा मोठा दिलासा; जिल्ह्य़ात ८ मृत्यू; १३४ नवीन रुग्ण

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत ८ करोनाबाधितांचा मृत्यू झाला तर १३४ नवीन रुग्णांची भर पडली. दुसऱ्या लाटेनंतर शहरात  प्रथमच २४ तासांत आढळलेल्या नवीन रुग्णांची संख्या पन्नासीत नोंदवली गेली, हे विशेष.

नागपुरात ५४, ग्रामीण ७७, जिल्ह्य़ाबाहेरील ३ असे एकूण १३४ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या नवीन रुग्णांची संख्या ३ लाख ३१ हजार ८७७, ग्रामीण १ लाख ४२ हजार ४७१, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ५७८ अशी एकूण ४ लाख ७५ हजार ९२६ रुग्णांवर पोहोचली आहे.  दिवसभऱ्यात शहरात ५, ग्रामीणला ०, जिल्ह्य़ाबाहेरील ३ अशा एकूण  ८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ५ हजार २७२, ग्रामीण २ हजार २९९, जिल्ह्य़ाबाहेरील ८ हजार ९६७ रुग्णांवर पोहोचली आहे. दिवसभरात शहरात २२६, ग्रामीणला २०४ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख २४ हजार ६६०, ग्रामीण १ लाख ३९ हजार ६३ अशी एकूण  ४ लाख ६३ हजार ७२३ व्यक्तींवर पोहोचली आहे. आजपर्यंतच्या  रुग्णांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण ९७.४४ टक्के आहे.

पाच जिल्ह्य़ांत करोनाचा एकही मृत्यू नाहीविदर्भातील अकरा जिल्ह्य़ांमध्ये २४ तासांत २६ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू तर ६७९ नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यातच करोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रथमच येथे पाच जिल्ह्य़ांत एकही मृत्यू नोंदवण्यात आला नाही. विदर्भातील एकही मृत्यू नसलेल्या जिल्ह्य़ांमध्ये गडचिरोली, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशीम या जिल्ह्य़ांचा समावेश आहे.

दरम्यान सोमवारी २४ तासांत नागपूर शहरात ५, ग्रामीणचे ०, जिल्ह्य़ाबाहेरील ३ अशा एकूण ८ रुग्णांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्य़ात दिवसभरात १३४ नवीन रुग्ण आढळले. विदर्भातील एकूण मृत्यूत नागपूर जिल्ह्य़ातील ३०.७६ टक्केमृत्यूंचा समावेश आहे. अमरावतीत ५ मृत्यू तर २०८ नवीन रुग्ण आढळले, चंद्रपूरला ६ मृत्यू तर ६३ रुग्ण, गडचिरोलीत ० मृत्यू तर २४ रुग्ण, यवतमाळला ० मृत्यू तर २७ रुग्ण, भंडाऱ्यात ० मृत्यू तर १४ रुग्ण, गोंदियात ० मृत्यू तर ५ रुग्ण, वाशीमला ० मृत्यू तर ५६ रुग्ण, अकोल्यात २ मृत्यू तर ४२ रुग्ण, बुलढाण्यात २ मृत्यू तर ८९ रुग्ण, वर्धा जिल्ह्य़ात ३ मृत्यू तर १७ नवीन रुग्ण आढळले.

चाचण्यांची संख्या घसरली

शहरात दिवसभरात ५ हजार ५२१, ग्रामीणला ४९५ अशा एकूण ६ हजार १६  चाचण्या झाल्या. ही संख्या जिल्ह्य़ात रविवारी ८ हजार ७७८ एवढी नोंदवण्यात आली होती.

कर्करोगग्रस्तांच्या लसीकरणासाठी विशेष सोय

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (आरएसटी) कॅन्सर हॉस्पिटल, तुकडोजी पुतळा येथे कॅन्सरग्रस्त रुग्णांना लस देण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लसीकरणाची वेळ सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत  राहणार आहे.  नागरिकांनी आधार कार्ड व वैद्यकीय दाखला सोबत आणल्यास तात्काळ लसीकरण करण्यात येईल. या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.  अधिक माहितीसाठी येथील दूरध्वनी क्रमांक ०७१२- २७४४४४१, ०७१२- २७४८९९५ वर संपर्क करता येईल.

गृह विलगीकरणातील रुग्ण दोन हजारांवर

शहरात २ हजार ५३१, ग्रामीणला ७०५ असे एकूण ३ हजार २३६ उपचाराधीन रुग्ण आहेत. त्यातील गंभीर संवर्गातील १ हजार १७२ रुग्ण विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये तर २ हजार ६४ रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.

‘हॉटेल, रेस्टॉरंट, लग्न समारंभ करोना वाढीस कारण ठरू नये’

हॉटेल, रेस्टॉरंट, मंगल कार्यालये, लॉंन, फॉर्म हाऊस, रिसॉर्ट करोना वाढीसाठी कारणीभूत ठरू नये. तेथील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करूनच व्यवसायाला सुरुवात करा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या. राऊत यांनी सोमवारी हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशन, नागपूर व उद्योग, व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. नागपूर जिल्’ात यापूर्वी झालेले लग्नसोहळे व मोठे कार्यक्रम करोना वाढवण्यास कारणीभूत ठरले होते. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि टाळेमुक्ती करताना जे निर्बंध घालण्यात आले, त्याचे पालन करा, असे पालकमंत्री म्हणाले. बैठकीला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. व अन्य अधिकारी उपस्थित होते.