इतरांपेक्षा ‘वेगळा’ कर्मचारी! डिसेंबर महिन्याचा अखेरचा आठवडा हा ‘आभाराचा आठवडा’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात कुणी ना कुणी असे येऊन जातात आणि त्यांचे आभार मानावे अशी कृती करुन जातात. कुणी कुणाला मदत करतात, तर कुणी कुणाला आधार देऊन जातो. या आभार आठवडय़ाच्या निमित्ताने अशाच काही आठवणींना उजाळा देण्याचा केलेला हा प्रयत्न! शासकीय कर्मचारी म्हटले की तो कामचुकार, कधीही जागेवर न मिळणारा, पैशाची मागणी करणारा, दिलेले काम वेळेत न करणारा.. अशा कितीतरी कारणांमुळे त्याची प्रतिमा अलीकडच्या काही दशकांपासून मलीन होत चालली आहे. मात्र, जसे पाचही बोटं सारखी नसतात तसेच सर्वच शासकीय कर्मचारी भ्रष्ट किंवा कामचुकारही नसतात. उलट दिलेले काम हे आपलं कर्तव्य माणून राबणारे कर्मचारी आजही शासकीय सेवेत आहेतच. नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात काम सांभाळणारे दादाराव अंभोरे हे त्यापैकीच एक. सेवानिवृत्त झाल्यावरही ते त्यांचे काम गत साडेतीन वर्षांपासून सांभाळत आहेत. कुठल्याही अपेक्षेविना. दादाराव ८० च्या दशकात शासकीय सेवेत लिपिक म्हणून रुजू झाले. कामातील एकाग्रता आणि दिलेले काम चोखपणे करण्याची सवय या दोन गोष्टींमुळे त्यांना परीक्षा विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. हा विभाग तसा महसूल खात्याला अपरिचित. कोणीही येथे काम करण्यास फारसा इच्छुक नसतो. त्याचे कारणही तसेच. केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोग, एनडीए आणि अशाच प्रकारच्या इतरही परीक्षांच्या नियोजनाची जबाबदारी ही या विभागाची असते. या कामात गोपनीयतेला कमालीचे महत्त्व असते. नियोजनातील थोडीशीही चूक संपूर्ण परीक्षा यंत्रणा कोलमडून पडण्यास कारणीभूत ठरते. यावरून दादाराव सांभाळत असलेल्या कामाचे महत्त्व अधोरेखीत होते. या विभागात गत दहा वर्षांपासून ते काम करीत आहे. वर्षांला २५ ते ३० परीक्षा, कधी एमपीएससी, कधी यूपीएससी, स्टाफ सिलेक्शन तर कधी एनडीएच्या परीक्षेची तयारी करायची असते. नागपूर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या परीक्षेसाठी देशभरातील विद्यार्थी नागपूरची निवड करतात. त्यामुळे येथे विद्यार्थ्यांची संख्याही २५ ते ३० हजारांच्या घरात असते. इतक्या विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था करायची, त्यासाठी शाळांना विनंती करायची. तेथील सुरक्षा आणि इतरही सुविधांवर लक्ष ठेवायचे. तसे या कामासाठी किमान दहा जणांच्या मनुष्यबळाची गरज. मात्र दादाराव यांना फक्त एक मदतनीस आहे. परीक्षा आयोजनाच्या कामात दादारावांचा इतका हातखंडा आहे. त्यामुळेच सेवानिवृत्तीनंतरही त्यांची सेवा घेतली जाते. यातूनच त्यांची कामावरील निष्ठा सिद्ध होते. लोकसेवा आयोगाकडून परीक्षेची तारीख कळली की पुढच्या कामासाठी ते वेळापत्रक ठरवितात. परीक्षा पूर्ण होईपर्यंत अविरत काम करणे व तेही ना ओरड, ना तक्रारविना. सकाळी १० ते सायंकाळी ५ या शासकीय कामकाजाच्या वेळेचे बंधन ते पाळत नाहीत. काम पूर्ण झाल्याशिवाय घरी जायचे नाही. दिमतीला वाहन नाही, शाळेच्या परवानगीसाठी ते स्वत: शाळा, महाविद्यालयांना सायकलने भेटी देतात. त्यातून विविध शाळा, महाविद्यालयांशी त्यांचे सलोख्याचे संबंध निर्माण झाले आहेत. दादाराव यांनी विनंती करायची आणि शाळांना त्यांना होकार द्यायचा. परीक्षा कुठलीही असो. असे मित्रत्त्वाचं नांत निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. एक मोठं आणि तेवढच जबाबदारीच काम एक कर्मचारी गत अनेक वर्षांपासून करतो, सेवानिवृत्तीनंतरही सेवा देतो. सरकारी खाक्यानुसार त्यांना धन्यवाद अधिकाऱ्यांना देता येत नाहीत. पण त्यांच्या कामाची विषयी ते आदर व्यक्त करतात. मात्र, त्यांनी उभ्या केलेल्या यंत्रणेतून जोडली गेलेली अनेक शाळा, महाविद्यालये, कर्मचारी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतात. मात्र, दादाराव यांना ते मान्य नाही. ते करीत असलेले काम त्यांना सेवा वाटत नाही. माध्यमांशी बोलणेही ते टाळतात. मी काहीच वेगळे करीत नाही, असे त्यांचे त्यावरचे उत्तर असते. यातच त्यांचे वेगळेपण आणि मोठेपणही दडले आहे.