नागपूर : राज्याच्या गृहमंत्रालयाकडून कारागृह रक्षकांची लवकरच भरती केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर ही प्रक्रिया सुरू होणार असताना अवघ्या १८०० जागांसाठी तब्बल पावणेचार लाख अर्ज आले आहेत. पोलीस दलातील अन्य पदांसाठीही लाखोंच्या संख्येने अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यात कारागृह रक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच कारागृहातील सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर आहे. ही बाब लक्षात घेऊन गृहमंत्रालयाने भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा >>> चंद्रपूर : उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील अटकेत; दोन दिवसांची पोलीस कोठडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यभरात १८०० रिक्त जागांसाठी ३ लाख ७२ हजार ३५४ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती अप्पर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) राजकुमार व्हटकर यांनी दिली. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेनंतर उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याखेरीज गृहमंत्रालयाने राज्य पोलीस दलातील शिपाई, चालक, बँड्समन, राज्य राखीव पोलीस दलातील जवानांची रिक्त पदे भरण्यासही मंजुरी दिली आहे. या १७ हजार ४७१ पदांसाठी तब्बल १७ लाख ७६ हजार अर्ज आले आहेत. यात पोलीस शिपायांच्या ९ हजार ५९५ रिक्त पदांसाठी सर्वाधिक ८ लाख २२ हजार ९८४ अर्ज आले. वाहनचालकाच्या १,६८६ जागांसाठी १ लाख ९८ हजार ३०० युवक-युवतींनी अर्ज केले आहेत.