नागपूर : राज्य सरकार नाशिक येथे कुंभमेळ्याची जोरदार तयारी आहेत. त्यासाठी ५ हजार कोटी खर्च केला जाणार आहे. पण, याच नाशिक जिल्ह्यात पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून महिलांना जीव धोक्यात घालून विहिरीत उतरण्याची वेळ येत आहे. महिला जीवाचा धोका पत्कारून विहिरीत उतरत असल्याची चित्रफित प्रसारित झाली आहे, याकडे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले आहे. ते आज माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
ते म्हणाले, घोटभर पाण्यासाठी माता-भगिनींना संघर्ष करावा लागतो. हे महाष्ट्रासाठी अत्यंत लाजीरवाणे आहे. पाण्यासाठी जर जीव मुठीत घेऊन विहिरीत उतरावे लागते असेल तर कसला विकास असा प्रश्न त्यांनी केला आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सरकार पाच हजारो कोटी रुपये खर्च करायला तयार आहे. उत्सवांवर, कार्यक्रमांवर उधळपट्टी करायला पैसा आहे, पण लोकांना प्यायला पाणी देण्यासाठी नाही? हा कसला प्राधान्यक्रम, हा कसला विकास आहे.
नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई असून महिलांना पाण्यासाठी विहिरीत उतरावे लागत आहे. त्याची चित्रफित व्हायरलं झाली आणि त्याचा आधार घेत वडेट्टीवार यांनी सरकारला विकासाच्या संकल्पबाबत प्रश्न विचारला.दरम्यानस नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पाड्यावरील महिला पाण्याच्या शोधात भटकंती करत असतात. आदिवासी भागात भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. डोक्यावर, कमरेवर हंडा, कळशी हातात घेऊन पाण्याच्या शोधात आदिवासी पाड्यावरील या महिला निघतात. एखाद्या विहिरीत थोडेफार पाणी असले की, तिकडे महिलांची रीघ लागते. गावातील निम्याहून अधिक महिला तिथे तुटून पडतात. पाण्यासाठी गावातील महिलांना संघर्ष करावा लागतो. नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. ग्रामीण भागातही दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. नागरिकांना पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यात जलसंकंट
जिल्ह्यात पाण्याची मागणी वाढली असून जलाशयेही हळूहळू तळाकडे जात आहेत. वेगाने होणाऱ्या बाष्पीभवनामुळे धरणांमधील एकूण पाणीसाठा ३८ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षीपेक्षा नऊ टक्के पाणी अधिक उपलब्ध असले तरी गौतमी गोदावरी, वाघाड आणि भोजापूर या तीन धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षाही कमी पाणी शिल्लक आहे.उन्हामुळे धरणांमधील पाण्याचेही वेगाने बाष्पीभवन होते आहे. याशिवाय पाण्याची दैनंदिन मागणी आणि वापर वाढल्याने धरणांमधील पाणीसाठाही कमी होऊ लागला आहे. जिल्ह्यात मध्यम आणि मोठ्या आकाराची मिळून एकूण २४ धरणे आहेत. या धरणांची ६५ हजार ६६४ दशलक्ष घनफूट एवढी साठवणक्षमता आहे. गेल्या वर्षी सात एप्रिलला धरणांमध्ये १९ हजार १४७ दशलक्ष घनफूट म्हणजेच २९.१६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. मात्र, यंदा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ३८.३६ टक्के म्हणजेच २५ हजार १९० दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे.