लोकसत्ता टीम

बुलढाणा : मृग नक्षत्र लागले असले तरी जिल्ह्यातील पाणी टंचाईचे भीषण संकट कायम आहे. या परिणामी पाणी टंचाई योजनेवरील खर्चाचे ‘मीटर’ जोराने धावत आहेत. आजवर विविध योजनांवर तब्बल ७ कोटी ७४ लाख रुपये खर्ची झाले आहे. जिल्ह्याच्या पाणी टंचाई कृती आराखड्यात १५७० उपाय योजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या.

त्यातील ५९४ योजनांना मंजुरी मिळाली असून ९५ प्रगतीपथावर आहे. ४८४ योजना पूर्ण झाल्या आहेत. त्यावर ७कोटी ७४ लाख रुपये खर्ची झाले आहे. यातील ४ कोटी१३ लाख निधी मिळाला असून ३ कोटी ६१ लाख निधी प्रलंबित आहे.

आणखी वाचा-“नवनीत राणा पराभूत झाल्‍याचा महाराष्‍ट्राला आनंद” बच्‍चू कडू यांनी भाजपला डिवचले

जिल्ह्यातील साडेतीन लाख ग्रामस्थांची पाणीटंचाईमुळे होणारी होरपळ आणि भटकंती जूनच्या पहिल्या आठवड्यातही कायम आहे. जिल्ह्यातील टँकरची संख्या ७८ वर गेली आहे. दुर्देवाने पावसाची दडी अशीच कायम असली तर हा आकडा शंभरी गाठणार असे चित्र आहे. ७ तालुक्यातील ७२ गावांना सध्या ७८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. चिखली आणि देऊळगाव राजा तालुक्यात प्रत्येकी १४, बुलढाण्यात १६, मेहकर मध्ये १५, सिंदखेडराजा मध्ये १०, मोताळ्यात ७, लोणार मध्ये २ टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे.

यामुळे तब्बल २ लाख१८ हजार ४७३ ग्रामस्थांचे बेहाल होत आहे. मागील किमान दोन महिन्यांपासून त्यांना भीषण पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. अनेक गावांना तर डिसेंबर व जानेवारीपासूनच टँकरवर अवलंबून राहण्याची पाळी आली आहे.

आणखी वाचा-लोकसभा निवडणूक : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना धक्का, काँग्रेसच्या दणदणीत यशाने नाना पटोलेंना…

२३९ गावांना खाजगी विहिरींचा आधार

दुसरीकडे २३९ गावांची तहान २८५ खाजगी अधिग्रहित विहिरीद्वारे भागविली जात आहे. देऊळगाव राजा तालुक्यात ५२ चिखली ५३ बुलढाणा २५ मेहकर ५१, मोताळा १८, लोणार ३९ सिंदखेडराजा ३९ तर शेगाव तालुक्यात ८ खाजगी विहीर अधिग्रहित करण्यात आल्या आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४७ धरणात १४ टक्केच जलसाठा

दरम्यान जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील ४७ लहानमोठ्या धरणात अल्प जलसाठा उरला आहे. मोठ्या ३ धरणापैकी खडकपूर्णा मध्ये केवळ मृत जलसाठाच उरला आहे. यासह पेन टाकळी व नळगंगा या तीन बृहत प्रकल्पात मिळून ११.१८ टक्केच जलसाठा आहे. सात मध्यम प्रकल्पात सरासरी १९ .९४ टक्के तर ३७ लघु प्रकल्पात सरासरी१२.६२ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.