नागपूर : मध्य रेल्वेच्या स्थापनेला ७० गौरवशाली वर्षे पूर्ण झाली असून शुक्रवारपासून ७१ व्या वर्षाला प्रारंभ झाला आहे.आशियातील (आणि भारतातील) पहिली रेल्वेगाडी १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणेदरम्यान धावली. जसजशी वर्षे उलटली, तसतशी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेचा विस्तार होत गेला. १९०० मध्ये जीआयपी रेल्वे कंपनीमध्ये इंडियन मिडलँड रेल्वे कंपनीचे विलीनीकरण झाल्यानंतर, तिची सीमा उत्तरेला दिल्ली, ईशान्येला कानपूर आणि अलाहाबाद आणि पूर्वेला नागपूरपासून दक्षिण-पूर्वेला रायपूरपर्यंत वाढवण्यात आली. अशाप्रकारे, बॉम्बेद्वारे भारताच्या जवळजवळ सर्व भागांशी संपर्क साधला गेला.
५ नोव्हेंबर १९५१ रोजी निजाम राज्य, सिंधिया राज्य आणि ढोलपूर राज्य रेल्वे यांचे एकत्रीकरण करून मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली. सध्या मध्य रेल्वेवर मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे असे पाच विभाग आहेत. मध्य रेल्वेचे नेटवर्क महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये ४,१५१ मार्ग किमीवर पसरलेले असून एकूण ४७१ स्थानके आहेत.
पहिली शताब्दी एक्सप्रेस, पहिली जन शताब्दी एक्सप्रेस, पहिली तेजस एक्सप्रेस आणि गेल्यावर्षी पहिली किसान रेल्वेबाबत मध्य रेल्वे विकासात सतत आघाडीवर आहे.
मुंबईची उपनगरीय सेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. मध्य रेल्वेने उपनगरीय नेटवर्कमध्ये सातत्याने वाढ केली असून आज चार मार्गिका आहेत. ३ डब्यांपासून सुरू झालेल्या उपनगरीय सेवा हळूहळू ९ डब्यांच्या, १२ डब्यांच्या आणि १५ डब्यांच्या काही सेवांपर्यंत वाढल्या आहेत.
दहशतवादी हल्ल्याचा सामना केला
मध्य रेल्वेनेही अनेक संकटांचा सामना करून ती मजबूत झाली आहे. मुसळधार पाऊस असो, २६ नोव्हेंबरचा दहशतवादी हल्ला असो किंवा करोनाचे गंभीर आव्हान असो, समर्पित कर्मचाऱ्यांनी या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि त्यावर मात करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी म्हणाले.