राज्याचे कृषीमंत्री अब्दूल सत्तार हे ‘एक दिवस बळीराजासोबत’ या उपक्रमांतर्गत मेळघाट दौऱ्यावर असताना धारणी तालुक्यातील लाकटू या गावात अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या एका शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.अनिल सुरजलाल ठाकरे (२६, रा. लाकटू), असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा : बुलढाणा : शिक्षकी पेशाला काळिमा ; शिक्षिकेच्या नावे प्रेमकविता लिहिली अन्…

माझा एक दिवस बळीराजासाठी या कृषी विभागाच्या उपक्रमाला मेळघाटमधून सुरुवात झाली. धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथे कृषीमंत्री अब्दुल सत्तार बुधवारी रात्रीच दाखल झाले. तेथून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर लाकटू हे गाव आहे. अनिल ठाकरे यांनी विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपवली. यावर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम अजूनही सुरूच आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम अजूनही मिळालेली नाही. अतिवृष्टीमुळे पीक नष्ट झाल्याने अनिल ठाकरे चिंतेत होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.