वाशिम : राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली युवक प्रदेशाध्यक्ष दामुअण्णा इंगोले यांच्या संयोजनात स्वाभिमानीचा नारा कर्जमुक्त सातबारा अभियान राबविण्यात येत आहे. विदर्भ मराठवाड्यातील दोन लाख शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचे अर्ज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात येणार आहेत.

शहरातील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना स्वाभीमानीचे युवक प्रदेशाध्यक्ष दामुअण्णा इंगोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना इंगोले म्हणाले की, मागील चार वर्षांपासून अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ अश्या विविध संकटामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. शिवाय महागाई नियंत्रणात ठेवण्याच्या नावाखाली सरकारने सोयाबीन, तूर, कांदा, कापूस, हरभरा, गहू व सर्वच पिकांचे भाव पाडले आहेत. एकीकडे सरकार निर्यातबंदी लावते तर दुसरीकडे आयात करते. त्यामुळे शेतकरी रसातळाला गेले आहेत. अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आता कर्ज भरणे शक्य नाही. परिणामी आत्महत्या वाढत आहेत. हे रोखण्यासाठी सरकारने मोठ्या उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ केले त्याप्रमाणे शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे कर्ज माफ करून सातबारा कर्जमुक्त करावा, यासाठी ‘कर्जमुक्त सातबारा’ हे अभियान १ जानेवारी २०२४ पासून विदर्भ व मराठवाडयातील प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा – काँग्रेस स्थापनादिनाच्या सभेची ऊर्जा लोकसभा निवडणुकीपर्यंत टिकणार का?

हेही वाचा – अमरावती विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरूंची प्रतीक्षा, निवड प्रक्रिया लांबली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वाभिमानीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेणार आहेत. त्यानंतर जवळपास दोन लाख शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचे अर्ज सादर करण्यात येतील. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे ही आमची भूमिका असून मागण्या मान्य न झाल्यास पक्षाच्यावतीने पुढील भूमिका ठरविण्यात येईल, असेही ते म्हणाले.