अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सत्तांतरानंतर शेतकऱ्यांसाठी प्रभावी योजना राबविल्या जात असतानाच आता विरोधकांकडून माजी आमदार तथा बँकेचे विद्यमान अध्यक्ष बच्चू कडूंना बँकेच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या हालचालींमागे राज्य शासन आणि काँग्रेसमधील छुपी युती असल्याची टीका त्यांनी केली आहे.अभिजीत ढेपे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून या बँकेवर काँग्रेसची मक्तेदारी राहिली आहे, दोन वर्षांपूर्वी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सत्तांतर झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी अनेक लाभदायक योजना बँकेमार्फत राबवल्या गेल्या. परंतु यामुळे बँकेवरील विरोधकांची मक्तेदारी संपल्याने, त्यांच्याकडून सातत्याने कारवाया सुरू आहेत.

दरम्यान, विभागीय सहनिबंधकांनी नाशिक येथील न्यायालयाच्या शिक्षेचा संदर्भ देत बच्चू कडू यांना संचालक पदाकरिता अपात्र ठरवले असून, या निर्णयाविरोधात बच्चू कडू यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्यांना दिलासा देत विभागीय सहनिबंधकांच्या आदेशावर स्थगिती दिली आहे.बच्चू कडू यांनी आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी व दिव्यांग व सर्वसामान्यांच्या मागण्यांसाठी शासनावर दबाव टाकला आहे, याचाच वचपा काढण्यासाठी त्यांना बँकेचे अध्यक्ष पदावरून काढण्याचा प्रकार म्हणजे राज्य शासन आणि काँग्रेसचा नियोजित कट आहे, राज्य शासनाच्या दबावाखाली निर्णय घेण्यात आले आहेत. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांपेक्षा बँकेवरील सत्ता अधिक महत्त्वाची वाटते, असे ढेपे म्हणाले. आमचा संघर्ष हा केवळ सत्तेसाठी नसून, शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे. तो संघर्ष आम्ही शेवटपर्यंत लढणार, असा निर्धारही ढेपे यांनी यावेळी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महत्त्वाचे निर्णय

बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. कर्ज वाटपामध्ये बँकेने मागील दोन वर्षांमध्ये बँकेला दिलेल्या लक्ष्यांकाच्या एकूण १०४ टक्के पूर्तता केलेली असून सन २०२३ मध्ये ५८९ कोटी रुपये तर सन २०२४ मध्ये ६४७ कोटी रुपयांचे वाटप केलेले आहे व यावर्षी सुद्धा ६११ कोटींचे वाटप पूर्ण झाले असून सप्टेंबर २०२५ पर्यंत बँकेला ७५० कोटी कर्ज वाटपाचे लक्ष्यांक आहे. दोन वर्षाच्या काळामध्ये बँकेने शेतकरी हिताच्या व शासनाची सबसिडी असलेली एन एल एम, सौर ऊर्जा कर्ज योजना, एज्युकेशन लोन, गोडाऊन कर्ज योजना ,नेट शेड या योजना नव्याने सुरू केल्या आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.