नागपूर : भारतीय जनता पक्षाने स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात सोमवारी पूर्व आणि पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या ११ वर्षातील यशस्वी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचा संकल्प व्यक्त केला. सोबतच यासाठी भाजप पहिल्यांदाच स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन सरकारी योजनांचा जनतेमध्ये प्रचार करणार असल्याचे सांगितले. परंतु, चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे भाजपसारख्या सर्वात मोठ्या पक्षाला स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी लागत असल्याचे समोर आले असून त्यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सोमवारी मुंडले शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यशाळेला चव्हाण यांनी संबोधित केले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपच्या संघटनात्मक बांधणीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यानिमित्त भाजपच्यावतीने देशभर संघटन पर्व राबवले जाणार आहे. ‘संकल्प ते सिद्धी’ या माध्यमातून मोदी यांच्या नेतृत्वात झालेला विकास, देशाची सुधारलेली आर्थिक परिस्थिती, जगात चौथ्या क्रमांची अर्थव्यवस्था, पाकिस्तानला दिलेले सडेतोड उत्तर याची माहिती घरोघरी जाऊन नागरिकांना दिली जाणार आहे. यासाठी पहिल्यांदाच भाजप स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार आहे. बैठकीला १९ जिल्ह्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेला भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके आणि अन्य पदाधिकारीही उपस्थित होते.

२५ जूनला काळा दिवस पाळणार देशात आणीबाणी कोणी लावली, संविधानाची पायमल्ली कोणी केली, त्याचे देशावर काय दुष्परिणाम झाले याची माहिती भाजपच्यावतीने घरोघरी जाऊन दिली जाणार आहे. याच कार्यक्रमात २५ जून रोजी काळा दिवस पाळला जाणार आहे. याचदिवशी देशात आणीबाणी लावण्यात आली होती. शेकडो समाजसेवकांना कारागृहात टाकण्यात आले होते, याबाबत माहिती दिला जाणार आहे. या माध्यमातून संविधानाचा अपमान करणारी काँग्रेसच आहे, असा संदेश घरोघरी पोहचवला जाणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा या आंदोलनाची रूपरेषा जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.