अकोला : विकास कामे केवळ कागदावर राहता कामा नये, तर ती जमिनीवर प्रत्यक्षात उतरली पाहिजेत, अशा शब्दात क्रीडामंत्री तथा वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. जिल्ह्यातील प्रलंबित कामांवरून पालकमंत्र्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आज, ६ जून रोजी पालकमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीला आ. श्याम खोडे, आ. किरण सरनाईक, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासह प्रलंबित कामांना गती देण्याची गरज आहे. जनतेला तातडीने सुविधा मिळाव्यात, यासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधत ठोस पावले उचलण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी पालकमंत्र्यांनी कृषी, जलसंधारण, महावितरण, पाणीपुरवठा, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी विभागांच्या योजनांची तपशीलवार माहिती घेतली. अनेक विकास कामे प्रलंबित असल्याचे लक्षात आल्यानंतर पालकमंत्र्यांनी ती तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहे.

जलसंधारणाची कामे लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळवून द्यावा. महावितरण विभागाने वीजपुरवठा सुरळीत राहील याची खात्री करावी. आरोग्य सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करून प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्री पुरवावी. पाणीपुरवठा योजनांमध्ये विलंब टाळण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या दर्जाबाबत विशेष लक्ष द्यावे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जनतेच्या अपेक्षा लक्षात घेऊन कामे करा’

जनतेच्या अपेक्षा लक्षात घेऊन काम करणे हीच खरी जबाबदारी आहे, असे मत पालकमंत्र्यांनी बैठकीदरम्यान व्यक्त केले. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना एकमेकांमध्ये समन्वय ठेवत निर्णय प्रक्रियेतील अडथळे दूर करण्याच्या सूचना केल्या. नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबतही चर्चा झाली. यामध्ये पाणीटंचाई, आरोग्य सुविधा, अपूर्ण रस्ते, अपुऱ्या वीज पुरवठ्याचे मुद्दे उपस्थित झाले. पालकमंत्र्यांनी या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. बैठकीला विविध विभागाचे यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.