अकोला : राजकारणात कोणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. योग्य वाटाघाटी झाल्या तर आम्ही संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ)सोबत जाणार आहोत. सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पाळली पाहिजेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी येथे व्यक्त केली. जानकरांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करून नव्या वाटेवर जाण्याचे संकेत दिले.
अकोला येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजकारणामध्ये काही पण होऊ शकते. दोन वर्षांपूर्वी आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)सोबत होतो. आता ‘संपुआ’सोबत योग्य वाटाघाटी करण्याचे प्रयत्न आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू आहे. अद्याप कोणत्याही आघाडीला आम्ही प्रस्ताव दिलेला नाही किंवा कुणाकडून प्रस्ताव देखील प्राप्त झाला नाही. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला आम्ही राहुल गांधींना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे, असे जानकर यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्ष स्वत:ला मजबुत करण्याचा प्रयत्न करतो. काँग्रेससह इतर पक्षांचेही तेच धोरण आहे. आम्ही देखील त्या दृष्टीने काम करीत आहोत. आता लगेच युती व आघाडी संदर्भात चर्चा करणे योग्य होणार नाही, असे देखील ते म्हणाले.
भाजपने निवडणुकीपूर्वी जी आश्वासने दिली, ती पूर्ण करावी, अशी आमची भूमिका आहे. राज्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही. तरुणांच्या बेरोजगारीची मोठी समस्या आहे. आदिवासी व इतर विभागाचा निधी इतरत्र वळवणे चुकीचे आहे. गरीब समाजाच्या ताटातील काढून इतर ठिकाणी वाटणे योग्य नाही. राज्य सरकारचे हे निर्णय चांगले नाहीत. दिलेली आश्वासने पूर्ण करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी त्या दृष्टीने निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे, दुधाचे भाव वाढले पाहिजे. आता हे म्हणतात की शक्य नाही, होत नाही, तर मग बोलले कशाला होते? असा संतप्त सवाल जानकर यांनी केला.
गडचिरोली ते मुंबई ‘लॉन्ग मार्च’ काढणार
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष ३१ मेपासून गडचिरोली ते मुंबई ‘लॉन्ग मार्च’ काढणार आहे. सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करावी, एवढीच आमची अपेक्षा आहे, असे जानकर यांनी सांगितले.