नागपूर: नागपूर महापालिकेत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत स्टाफ नर्स (कंत्राटी) पदांसाठी नुकतीच भरती झाली. यावेळी उमेदवारांची निवड करताना निकषांना हरताळ फासल्याचा आरोप काही उमेदवारांनी केला आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रियाच आता वादात सापडली आहे.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत नागपूर महापालिकेकडून १० ते १७ जुलै २०२३ पर्यंत कंत्राटी परिचारिका भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यात अनुसूचित जाती, भटक्या जमाती (ड), ओबीसी, ईडब्ल्यूएस या संवर्गातील नर्सेसची पदे भरावयाची होती. २३७ उमेदवारांनी अर्ज केले. १३७ पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. तात्पुरत्या स्वरूपातील ही यादी असल्याने उमेदवारांकडून १३ ऑक्टोबरपर्यंत आक्षेप मागवले होते.

हेही वाचा… ९० दिवसानंतरही सापडला नाही भाजप नेत्या सनाचा मृतदेह

स्टाफ नर्स कंत्राटी पदांकरिता अंतिम वर्षातील प्राप्त गुणांच्या टक्केवारीत ५० टक्के गुण असावे, अतिरिक्त शैक्षणिक अर्हता असल्यास २० गुण आवश्यक, अनुभव असल्यास प्रत्येक वर्षासाठी ६ गुण द्यावे असा निकष होता. गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड होणार होती. प्रत्यक्ष मुलाखत नव्हती. यामुळेच खासगी उमेदवारांना कमी गुण देत त्यांना निवडीपासून दूर ठेवल्याची तक्रार उमेदवारांनी केली आहे. यादीसंदर्भात मागवण्यात आलेल्या आक्षेपांवर थातूरमातूर उत्तरे दिल्याची तक्रारही उमेदवारांनी केली. राज्य व केंद्राचे निकष असताना स्वतःचे निकष लावण्यात आले. या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचेही संतप्त उमेदवारांचे म्हणणे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अधिकारी काय म्हणतात…

खासगी संस्थेतील अनुभवाच्या प्रमाणपत्रांवर आवक- जावक क्रमांक नव्हते. यामुळे तपासणीत अडचणी आल्या. यामुळे कार्यकारी मंडळात झालेल्या चर्चेनंतर खासगीतील उमेदवाराला तीन तर शासकीय संस्थेतील उमेदवारांना सहा गुण देण्याचा निकष लावून नियुक्ती केली गेली, अशी माहिती पत्रकारांनी भ्रमणध्वनीवर विचारलेल्या प्रश्नावर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी दिली.