नागपूर: अंबाझरी मागच्या वर्षीचा पूर नैसर्गिक नव्हे तर मानवनिर्मित होता. प्रशासनाने पुढचा धोका टाळण्यासाठीचे अद्यापही ठोस उपाय केले नाहीत. याचा निषेध म्हणून २३ सप्टेंबरला नागनदीची पूजा, श्राद्ध करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रसादाचे वाटप करू. येत्या निवडणंकीत मतदानावर बहिष्कार घालू, अशी घोषणा अंबाझरी व डागा लेआऊट येथील संतप्त पूरग्रस्तांनी केली.

डागा ले- आऊट येथील हनुमान मंदिरात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महेंद्र चांडक म्हणाले, मागच्या वर्षीच्या पुरानंतर प्रशासनाकडून भरपाईची घोषणा झाली. परंतु निवडक लोकांनाच १० हजारांची मदत दिली गेली. प्रत्यक्षात लक्षावधींचे नुकसान झाले. पुन्हा या पद्धतीची घटना घडू नये म्हणून प्रशासनाने ठोस उपाय केले नाहीत. न्यायालयानेे फटकारल्याने काही कामे सुरू झाली. परंतु, त्यातही निकृष्ठ काम होत आहे.

हे ही वाचा…नागपूर : गडकरी म्हणाले “आम्हाला गॅरंटी नाही, मात्र आठवले यांना चौथ्यांदा मंत्री होण्याची गॅरंटी…..”

अंबाझरीतील क्रेझी केसल आणि शंकरनगर परिसरात चुकीच्या पद्धतीने भिंत उभारल्याने नाल्याची रुंदी कमी झाली. नाल्याची खोली वाढवतांना काही ठिकाणी खड्डे केले, तर काही ठिकाणी तसेच सोडले गेले. पुराला कारणीभूत असलेले स्मारक अद्यापही हटवले नाही. आता तर त्याला वाचवण्याचाच घाट घातला जात आहे. डॉ. अर्चना देशपांडे म्हणाल्या, पुराच्या काळात निकृष्ठ आपत्ती व्यवस्थापनाचा नमुना आम्ही पाहिला. पोलीस, अग्निशमन विभाग, महापालिकेकडून प्रतिसाद मिळाला नाही. अमोद देव म्हणाले, हा पूर चुकीच्या ठिकाणच्या स्मारकामुळे आला. परंतु प्रशासन पुतळा वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. या पत्रकार परिषदेला उमेश भोनसुले, माधुरी पाटणकर, गजानन देशपांडे, सत्यनारायन जाजू, प्रल्हाद चरपे उपस्थित होते.

हे ही वाचा…नागपूर :पुरासाठी पुतळा कारणीभूत ठरला का ? एक वर्षांनंतरही प्रश्न अनुत्तरित

सर्वच नेते हरवले

पुरानंतर नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विकास ठाकरे या सगळ्याच पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेऊन निवेदन दिले. परंतु काहीही झाले नाही. पुरानंतर एकही नगरसेवक राहिलेली व्यक्ती परिसरात भटकली नाही. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना आम्हाला धडा शिकवावा लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

हे ही वाचा…नागपूर : “एक नेता, एक निवडणूक म्हणजे राष्ट्रहित नव्हे,” साहित्यिक-समीक्षकांचे मत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागरिकांच्या मागण्या काय?

अंबाझरी तलावात उभारलेले स्वामी विवेकानंद यांचे स्मारक इतरत्र हलवावे.
नाल्यावर उभारल्या जाणारे पुल मोठे करावे.
नागनदीचे पात्र मोठे करावे.
डागा ले- आऊट येथे अनधिकृतरित्या उभारलेले स्केटिंग ग्राऊंड इतरत्र हटवावे.
अंबाझरी नाल्याचे खोलीकरणासह इतर कामे चांगल्या दर्जाची करावी.
शासनाच्या समितीत पुरग्रस्त भागातील प्रतिनिधींचा समावेश करावा.
शंकरनगर, अंबाझरीतील क्रेझी केसल परिसरात चुकीच्या पद्धतीने नाल्यावर उभारलेली भिंत पाडून नाल्याचे पात्र मोठे करावे.
रस्त्यावरील सांडपाणी वाहून नेणारे नाले व नाल्यातील पुलाखालील गाळ काढावे व इतर.