नागपूर : विधानसभेच्या निवडणुकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात सामोरे जायचे आहे, असे पत्रक नागपूरमध्ये झालेल्या भाजपच्या विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांना वाटण्यात आले आहे. त्यामुळे वरील नेत्यांच्या नेतृत्वातच निवडणूक लढवली जाणार हे आता स्पष्ट झाले आहे.

मंगळवारी अमित शहा यांच्या उपस्थितीत येथील सुरेश भट सभागृहात विदर्भातील भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची संवाद बैठक पार पडली. त्यात विदर्भातील सर्व ६२ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. बैठक स्थळी कार्यकर्त्यांना पक्षातर्फे ‘संकल्प दृढ विजय का’ हे पत्रक वाटण्यात आले. त्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी एक परीक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण शक्तीने या निवडणुकीला सामोरे जायचे आहे, असे नमूद करण्यात आले आहे. पत्रकात कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘‘कार्यकर्त्यांनी निवडणूक जिंकत नाही तोवर कोणीही थकणार नाही, थांबणार नाही, विश्रांती घेणार नाही असा संकल्प करावा. महाराष्ट्रात परीक्षेच्या काळात काही लोक आपल्याला चक्रव्यूहात अडकवू पाहत आहेत. मात्र आपल्याला तो चक्रव्यूह भेदायचा आहे, असा कानमंत्रही कार्यकर्त्यांना या पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

हेही वाचा >>>नागपूर:कर्मचारी संपामुळे वीज संकटावर महत्वाची अपडेट.. कृती समिती म्हणते…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पवार, ठाकरेंना रोखणे हेच लक्ष्य

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेससह शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांना रोखणे हेच भाजपचे लक्ष्य असून त्या दिशेने प्रयत्न करा, यासाठी जिथे जिथे विरोधकांची ताकद आहे तेथे त्यांच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना पक्षात घ्या, असे आवाहन शहा यांनी केले. पक्षामध्ये कुठलीही गटबाजी खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी नेते व कार्यकर्त्यांना दिला. विदर्भात कुठल्याही परिस्थितीत महायुतीला ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य गाठायचे आहे. महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यावर गटबाजी टाळा, विरोधकांची जेथे ताकद आहे, तेथील कार्यकर्त्यांना पक्षात सहभागी करून घ्या. प्रत्येक बूथवर दहा टक्के मत वाढवण्यासाठी प्रयत्न करा, असे शहा यांनी यावेळी सांगितले.