अमरावती : प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी कागदी कपांमधून चहा देण्याचे प्रकार सुरू झाले. अनेकांना आता कागदी कपातून चहा पिण्याची सवय झाली आहे. मात्र, हीच सवय आरोग्यास हानीकारक असून एका दिवसात तीन वेळा कागदी कपातून चहा प्यायल्यास सूक्ष्मस्वरूपातील प्लास्टिकचे जवळपास ७५ हजार कण शरीरात जात असल्याचे संशोधनातून समोर आले.
सामाजिक कार्यकर्त्यांनी या कपांवर बंदी घालण्याची मागणी केली, अखेरीस प्लास्टिकचे आवरण असलेल्या चहाच्या कागदी कपांवर बंदी घालण्याचे आदेश अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाने काढले आहेत. येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड राम बुरंगे यांनी यासंदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला आता यश आले आहे.
कर्करोगासारख्या दुर्धर आजारांना कारणीभूत असलेल्या प्लास्टिक आवरण असलेल्या चहाच्या कागदी कपांवर बंदी घालण्यासंदर्भात नियमाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करण्यात यावी आणि कार्यवाहीचा अहवाल संबंधितांना कळवावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, नगरपालिका प्रशासनाचे सहायक आयुक्त आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना पत्रात म्हटले आहे.
चहा पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कागदी कपांना बीपीए नामक घातक रसायनाचा वापर करून प्लास्टिकचा थर देण्यात येतो. त्यातून प्लास्टिकचे सूक्ष्म कण शरीरामध्ये रक्ताद्वारे पसरतात. पर्यायाने हृदय, मूत्रपिंड, यकृताशी संबंधित आजार, दुर्धर असा कर्करोग होण्याचीही शक्यता असते, त्यामुळे या कपांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी ॲड राम बुरंगे यांनी केली होती.
कागदी कपमध्ये चहा आणि कॉफी पिणे धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सामान्यतः, कागदी कपमध्ये जलरोधक गुणधर्मांसाठी प्लास्टिकचा थर वापरला जातो. तो खूप नाजूक आणि पातळ असतो. हे मायक्रोप्लास्टिक्स आरोग्यासाठी खूप धोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे. या कपांमध्ये चहा ओतला जातो तेव्हा ते द्रवांमध्ये मिसळतात आणि पचनसंस्थेत जातात. परिणामी, प्लास्टिकचे कण आरोग्याला हानी पोहोचवू शकतात आणि कर्करोगासारखे आजार निर्माण करू शकतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आयआयटी खरगपूरच्या शास्त्रज्ञांनी याविषयी संशोधन करून काही निष्कर्ष काढले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाने प्लास्टिकचे आवरण असलेल्या चहाच्या कपांवर बंदी घालण्याचे आदेश काढल्याने आपण या निर्णयाचे स्वागत करतो. या बंदीची अंमलबजावणी होण्यासाठी या प्रकियेमध्ये शासन, प्रशासन आणि नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. – ॲड राम बुरंगे, अमरावती.