अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. अमरावती विभागाचा निकाल ९३.२२ टक्के लागला आहे. नऊ विभागीय मंडळांमध्ये गेल्या वर्षी ९६.८१ टक्के निकालासह अमरावती विभाग राज्यात सातव्‍या स्थानी होता यावेळी सहाव्‍या स्थानी सुधारणा झाली आहे.

वाशीम जिल्हा ९५.१९ टक्क्यांसह विभागात पहिला आला आहे. तर सर्वात कमी निकाल (९१.४९ टक्के) यवतमाळ जिल्ह्याचा आहे. बुलढाणा जिल्ह्याचा निकाल ९३.९०, अकोला ९३.६२, तर अमरावती जिल्ह्याचा निकाल ९२.९२ टक्‍के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच निकालात यशाचा ठसा उमटवला असून मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.५५ टक्‍के इतकी आहे. मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.१७ आहे.

हेही वाचा – नागपूर : बार्टी महासंचालकांचा समतादुतांच्या कार्यशाळेत बेभान डान्स; आंबेडकरी समाजात तीव्र संतापाची लाट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विभागीय मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीची परीक्षा मार्च ते एप्रिलदरम्यान घेण्यात आली. या परीक्षेकरिता अमरावती विभागातून १ लाख ५८ हजार ३४५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यातील १ लाख ५६ हजार ५७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी १ लाख ४५ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागात तब्बल ४७ हजार ४७१ विद्यार्थी हे प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ५३ हजार ५१८ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत तर ३६ हजार ५७६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीतून उत्तीर्ण झाले आहेत. ८ हजार ४०० विद्यार्थी हे काठावर उत्तीर्ण झाले आहेत.