अमरावती : शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० आणि मागेल त्याला सौर कृषी पंप या अत्यंत महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून राज्यात १६ हजार आणि परिमंडळात ७८३ मेगावॅट वीज विकेंद्रीत स्वरूपाचे सौर प्रकल्प उभारून वीज निर्मिती करण्यात येणार आहे. अमरावती परिमंडळातील १८८ पैकी फक्त ९ सौर प्रकल्प सुरू झाले आहेत. परंतु तरीही परिमंडळातील शेतीला दिवसा आठ तास वीजेची उपलब्धता आणि तांत्रिक फिजिबीलीटी पूर्ण करणाऱ्या त्या सर्वच शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा निर्देश महावितरणच्या मुख्य कार्यालयाने दिले दिले आहेत.
शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्याची उपलब्धता आणि तांत्रिक बाबी शक्य असल्यास त्या भागातील शेतकऱ्यांना तत्काळ दिवसा आठ तासाकरीता वीज पुरवठा सुरू करावा, तसेच दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी तांत्रिक फिजिबिलीटी नसेल तर आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा प्रस्ताव परिमंडळ कार्यालयाला पाठवावा असे निर्देश मुख्य अभियंता अमरावती परिमंडळ अशोक साळुंके यांनी दिले आहे.
शेतीला दिवसा वीज देण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबी आणि उपकेंद्राचे सक्षमिकरण करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेशी जोडण्यात आलेल्या ३३ केव्ही उपकेंद्राची देखभाल दुरूस्ती करून उपकेंद्राचे सक्षमीकरण करण्यात आले आहेत. आवश्यक त्या ठिकाणी ६ पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या क्षमतेतही वाढ करण्यात आली असून ५ उपकेंद्रात नविन पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहे. त्याचबरोबर आरडीएसएस योजनेत परिमंडळात गावठान आणि कृषी फिडर वेगळे करून परिमंडळात २०५ नविन फिडर टाकण्याचे काम सुरू असून ४८ फिडरचे काम पूर्ण झाले आहे. याचबरोबर पुसद विभागात पेढी आणि जाम बाजार येथे नविन ३३ केव्ही चे उपकेंद्र उभारण्यात येत आहेत.
शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतात जावे लागते. रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जीव जोखमीत घालून शेतात जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा १२ तास कृषी पंपांसाठी अखंडित वीज पुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी मागील कित्येक वर्षांपासून करीत आहेत. शेतकऱ्यांना दिवसाही विजेचा पुरवठा व्हावा, यासाठी केंद्र सरकारच्या ‘कुसूम’ योजनेला मुख्यमंत्री सौर योजनेची जोड देण्यात आली आहे. २०२६ च्या अखेरपर्यंत दिवसाचे १२ तास शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य आहे.