नागपूर : भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते सरन्यायाधीश पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथम महाराष्ट्रात आले. मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी राज्य शिष्टाचार (प्रोटॉकालचा) मुद्दा उपस्थित केला. काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हाच धागा पकडून सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांनी न्यायसंस्थेबाबत आदर न बाळगल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र जिद्द आणि चिकाटीने देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी पोहचतो आणि त्याच्याच राज्यात सरकारकडून अपमान होतो ही अत्यंत वाईट घटना आहे.

महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेल्या सत्ताधाऱ्यांना आणि उच्चपदावर असलेल्या अधिकाऱ्यांना न्यायसंस्थेचा राग आहे का? साधा प्रोटोकॉल पाळता येत नाही? याची जबाबदारी सरकार आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी घेणार का? किमान स्पष्ट करावे कोणाची चूक आहे? असे वडेट्टीवार यांनी एक्सवर म्हटले आहे.

सरन्यायाधीश बी.आर. गवई मुंबईत आल्यानंतर राजशिष्टाचारानुसार त्यांचे स्वागत करण्यासाठी पोलीस व प्रशासनातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र, तसे न झाल्याने ‘महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकारी राजशिष्टाचाराचे पालन करत नाही’, अशी खंत सरन्यायाधीश गवई यांनी व्यक्त केली.

‘राजशिष्टाचाराचे पालन राज्यातील अधिकारी करत नाहीत, याबद्दल मी निराश झालो आहे. जर भारताचा सरन्यायाधीश प्रथमच महाराष्ट्रात येत असेल, तर राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हे उपस्थित असणे अपेक्षित आहे. त्यांची अनुपस्थिती विचार करायला लावते’, असे गवई एका कार्यक्रमात म्हणाले.

न्यायपालिका, विधिमंडळ आणि कार्यपालिका हे लोकशाहीचे तीन प्रमुख स्तंभ आहेत. या सर्वांनी एकमेकांचा सन्मान करणे आवश्यक आहे. ते म्हाणाले ‘मी सर्वांचा खूप आभारी आहे. मला जे प्रेम आणि सन्मान मिळाला आहे, त्याने मी भारावून गेलो आहे. गेली ४० वर्षे मला हा स्नेह मिळत आहे. आजचा कार्यक्रम माझ्यासाठी अविस्मरणीय आहे, असे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाषणानंतर सरन्यायाधीशांनी चैत्यभूमीला भेट दिली. गवई यांनी आपल्या भाषणात खंत व्यक्त केल्यानंतर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी चैत्यभूमीच्या दिशेला धाव घेतली. कारण तोपर्यंत ‘बार कौन्सिल’चा कार्यक्रम आटोपला होता. सरन्यायाधीश भूषण गवई भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले होते. दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी सरन्यायाधीशांबाबत राजशिष्टाचार न पाळण्यात कोणाची चूक आहे. हे स्पष्ट करावे आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने करावाई करण्याची मागणी त्यांनी केली.