वर्धा : राज्य शासनाने वर्धा येथे रुग्णालयासह वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले. त्यासाठी वर्धेलागत सातोडा येथे जागाही निश्चित केली. मात्र, हे महाविद्यालय हिंगणघाट येथेच व्हावे म्हणून आंदोलन सुरू झाले. आधीच दोन महाविद्यालये सुरू असल्याने वर्धेत तिसरे महाविद्यालय कशाला, असा युक्तिवाद करीत हिंगणघाट बंद पाळण्यात आला. आता आर्वीकरांनीही या महाविद्यालयाची मागणी करीत रेटा देणे सुरू केले आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर तळेगाव येथे जागा उपलब्ध असून आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील नागरिकांना त्याचा लाभ होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी निवेदन देत स्पष्ट केले. सेवाग्राम व सावंगी रुग्णालय हे सत्तर किलोमीटर दूर अंतरावर असल्याने या भागातील रुग्णांना तेथील वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच महामार्गावर नित्य अपघात होतात. अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार मिळू शकत नाही. म्हणून आर्वी हे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी योग्य ठिकाण असल्याचा दावा झाला.

हेही वाचा – वर्धा : ऐकलं का? म्हणे, विद्यापीठातील मूर्तीचे नाक जनावरांनी तोडले; पोलिसांचा अफलातून तर्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राप्त माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव सुमित वानखेडे हेसुद्धा आर्वीत वैद्यकीय महाविद्यालय खेचण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. त्यांची येथील लोकसेवा चर्चेत आली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पत्रकार विजय अजमिरे म्हणाले की, आर्वीत हे महाविद्यालय व्हावे म्हणून पडद्यामागे प्रयत्न सुरू झाले आहे. तळेगाव येथे जागेची चाचपणी झाल्याची माहिती मिळते. राजकीय वजन पुरेसे असल्याने आर्वीचा दावा मजबूत ठरतो.