लोकसत्ता टीम

अकोला : धावत्या रेल्वे गाडीमध्ये प्रवाशांना आता चक्क एटीएमची सुविधा मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने प्रवाशांच्या सोयीसह गैर-भाडे महसूल प्राप्तीसाठी क्रांतिकारी उपक्रम सुरू करत नव्या युगाची सुरुवात केली आहे. रेल्वे प्रवास अधिक आधुनिक आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने भुसावळ विभागाने महाराष्ट्र बँकेच्या समन्वयाने धावत्या गाडीत देशातील पहिली ‘ऑनबोर्ड एटीएम’ सेवा सुरू करण्यासाठी चाचण्या सुरू केल्या आहेत.

गाड्यांमध्ये एटीएम बसवण्याची संकल्पना प्रथम भुसावळ विभागाने आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण गैर-भाडे महसूल ग्राहक संवाद बैठकीत मांडण्यात आली होती. या दूरदृष्टीपूर्ण कल्पनेला प्रतिसाद देत प्रमुख राष्ट्रीयीकृत बँक ऑफ महाराष्ट्रने नवीन, नाविन्यपूर्ण गैर-भाडे महसूल कल्पना योजना अंतर्गत औपचारिक प्रस्ताव सादर केला. सध्या गाडी क्रमांक १२११० मनमाड–मुंबई सीएसएमटी पंचवटी एक्सप्रेसमध्ये या सेवेच्या व्यवहार्यता व कार्यक्षमतेची चाचणी सुरू आहे. ही गाडी दररोज मनमाड ते मुंबई सीएसएमटी दरम्यान धावते. एकूण २२ डब्यांच्या या गाडीची आसन क्षमता २०३२असून दररोज सुमारे २२०० प्रवासी मुंबई सीएसएमटीकडे प्रवास करतात.

संपूर्ण गाडी ‘वेस्टिब्यूल कनेक्टेड’ असल्यामुळे सर्व श्रेणीतील प्रवाशांना या एटीएमचा सहज लाभ घेता येणार आहे. या सेवेसाठी प्रवाशांच्या आसनव्यवस्थेवर किंवा सुविधांवर कोणताही परिणाम होणार नाही. एटीएम कोचमधील पूर्वी न वापरलेल्या जागेत बसवण्यात येत आहे. ही संपूर्ण उपक्रम योजना भारतीय रेल्वेच्या विद्युत व यांत्रिक विभागांच्या समन्वयातून राबवली जात आहे. ही ‘ऑनबोर्ड एटीएम’ सेवा प्रत्यक्षात अंमलात आल्यावर प्रवाशांना प्रवासादरम्यान सहज आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि आकस्मिक गरज असलेल्या प्रवाशांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरेल. ही एटीएम सेवा मोबाईल नेटवर्कद्वारे सतत जोडलेली राहणार असून, गाडी सुरू असतानाही व्यवहार शक्य होतील.

लवकरच इतर गाड्यांमध्ये ही सुविधा

भारतीय रेल्वेच्या प्रवासी अनुभवात सातत्याने सुधारणा आणि पारंपरिक महसूल पद्धतींपलीकडे जाऊन नवकल्पना राबवण्याच्या दृष्टिने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. भुसावळ विभाग या उपक्रमाचे नेतृत्व करीत आहे. लवकरच इतर महत्वाच्या गाड्यांमध्येही ही सुविधा देण्याच्या शक्यतेचा विचार केला जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि आर्थिक व्यवहार देखील करता येणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.