लोकसत्ता टीम

बुलढाणा: दोन दिवसापासून सुरू असलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर भाजप बंडखोर उमेदवार तथा भाजप लोकसभा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे यांनी आज आपली तलवार म्यान केली! भाजपच्या बहुचर्चित ‘अब की बार ,चार सौ पार’ या उद्दिष्टासाठी आपण माघार घेत असल्याचे त्यांनी आज जाहीर केले. आज माघार घ्यायच्या अंतिम दिवशी म्हणजेच ८ एप्रिलला आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रपरिषदेत त्यांनी माघारीचा निर्णय जाहीर केला. तसेच त्यामाघील भूमिकाही स्पष्ट केली. पक्षहित आणि नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले. चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यावेळी उपस्थित होत्या.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवून भारताला सर्वोच्च स्थानी पोहचवणे आणि त्यासाठी अबकी पार ४०० पार हेच आमचे लक्ष्य आहे .त्यामुळे आपण अर्ज मागे घेत आहोत.” असे विजयराज शिंदे यावेळी म्हणाले.

आणखी वाचा-पंतप्रधान मोदींची वर्धेतही सभा? रामदास तडस यांना खात्री, ते म्हणतात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उमेदवारी अर्ज भरून महायुतीत खळबळ उडवून देणाऱ्या विजयराज शिंदे यांनी माघार घ्यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन यांनी प्रयत्न केले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आ. श्वेताताई महाले यांना विजयराज शिंदेंशी चर्चा करण्यासाठी पाठवले होते, शिवाय काल ७ एप्रिलला नागपुरात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत देखील यावर चर्चा झाली.त्यात बावनकुळे यांनी शिंदेंना, ‘अर्ज मागे घ्या, युती धर्माचे पालन करा’ असे बजावले होते.त्यानुसार शिंदेंनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.