वर्धा : बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणमंत्री दादा भुसे येणार म्हणून सफाई करण्यात आली. ही साफसफाई विद्यार्थ्यांकडून घेण्यात आल्याची ओरड होत आहे. दीर्घ सुटीनंतर शाळा सुरू होणार म्हटल्यावर शालेय परिसराची साफसफाई करणे भाग असते. शिक्षक मुलांकडून साफसफाई करवून घेत असल्याची चर्चा सुरू झाली. शिक्षणमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असल्याचे वृत्त आहे. यावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने नाराजी नोंदविली आहे.
प्राथमिक शाळांमध्ये शिपाई (चतुर्थ श्रेणी कर्मचारी) नसतात. वर्गखोल्या, स्वच्छतागृहे आणि शालेय परिसराची स्वच्छता या गोष्टींसाठी स्वतंत्र अनुदान दिले जात नाही. गेली कित्येक वर्षे शिक्षकांसह विद्यार्थी ही कामे करत आले आहेत. कोणीही याबाबत तक्रार केली नाही. आज शिक्षक असलेल्या अनेकांनी विद्यार्थीदशेत असताना ही कामं अत्यंत आवडीने केली आहेत. नीटनेटकेपणा, श्रमप्रतिष्ठा ही मूल्ये अंगी बानवण्यास याची मदत झाली. ज्या दिवशी शाळा सारवायची असायची त्या दिवशी उत्सव साजरा केला जात असे. शेण आणायला पोरं गावभर गोठे आणि शेण शोधत फिरत असायची. विहिर, ओढ्यावरून पाणी आणायला जायचं. सगळी कामं आम्ही पोरं अत्यंत आवडीने करत असायचो. कोणी कधी तक्रार केली नाही, असे संघटना नेते विजय कोंबे स्पष्ट करतात.
शालेय परिसराची विद्यार्थ्यांनी स्वच्छता करायची नाही तर मग ही कामे रोजच्या रोज कोणी करायची ? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.साफ सफाईची कामे कशी करायची याबाबत शाळांच्या मुख्याध्यापकांनी राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि ग्राम विकास विभागाकडे याबाबत मार्गदर्शन मागण्याची गरज आहे.सगळ्यात दुर्दैवी बाब म्हणजे शिक्षणमंत्र्यांनी कारवाई करण्याबाबत दिलेलं स्टेस्टमेंट आहे. स्वछता हा एक संस्कार आहे. हा संस्कार जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यावर झालाय. जपानसारख्या प्रगत देशामध्ये विद्यार्थ्यांना शाळेतच स्वच्छतेचे धडे दिले जातात. अन् आपल्या देशात या बाबीला दस्तुरखुद्द शिक्षणमंत्री महोदयांनी चुकीचं म्हणणं अन संबंधितांवर कारवाईची भाषा करणं हे कितपत योग्य आहे.
आणि कित्येक वर्षापासून शाळेला स्वच्छता कामगार देण्याची शासनाकडे मागणी करत आहोत. जर विद्यार्थ्यांना सोबत घेऊन शिक्षक स्वच्छता करत असेल आणि हे जर चुकीचं आहे असे शासनाला आणि समाजाला वाटत असेल. तर स्वच्छता करण्यासाठी शासनानेच व्यवस्था केली पाहिजे. सन्माननीय लोकप्रतिनिधी व समाजाने ही मागणी रेटून धरली पाहिजे. अनेक जिल्हा परिषदांनी ग्रामपंचायतीकडे शाळांच्या स्वच्छतेची जबाबदारी सोपवली आहे. परंतु राज्यात अशाप्रकारे कोणत्याही ग्रामपंचायतीने शाळेची स्वच्छता करण्यासाठी व्यवस्था केलेली नाही.
उठसुट शिक्षकांवर कारवाईची भाषा करण्याऐवजी- शाळेची स्वच्छता आणि इतर शैक्षणिक कामासाठी शासनानेच पुढाकार घेतला पाहिजे, असे आज संघटनेने निवेदनातून स्पष्ट केले.