अकोला : पुलाचे कठडे तोडून चारचाकी खाली कोसळल्याची घटना बाळापूर-वाडेगाव रस्त्यावर कुपटा येथील पुलाजवळ रविवारी रात्री घडली. या भीषण अपघातात तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी झाला आहे.
अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथून भरधाव वेगाने निघालेली चारचाकी (क्र. एमएच ३० एझेड ७५५७) गाडी पुलाचे कठडे तोडून थेट पुलाखाली कोसळली. या भीषण अपघातात बाळापूर येथील रहिवासी कन्हैयासिंग ठाकूर (५५), विशाल सोलनकर (४५) आणि सुनील शर्मा (४५) या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आशिष ठाकूर हे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर बाळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी अकोला येथे आणले. या अपघाताची माहिती मिळताच वाडेगाव, मांडवा आणि कुपटा गावातील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पुलाखाली पडलेल्या गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्यास पोलिसांना मदत केली. या भीषण अपघातात चारचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
अनियंत्रित ट्रक दरीत कोसळून एक ठार पातूर घाटात मालवाहू ट्रक अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर घाट मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. इंदोरकडे निघालेला पाइपने भरलेला मालवाहू ट्रक (क्र. एमपी-२० एचयु-१२४७) घाटाच्या तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने खोल दरीत कोसळला.
या अपघातात चिंटू नंदलाल (वय २१, रा. कोटा, राजस्थान) या चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी साबिर खान (रा. कोटा) गंभीर जखमी झाला आहे. अपघातात ट्रक पूर्णता क्षतिग्रस्त झाला. चालकाचा मृतदेह ट्रक आणि पाइपखाली अडकला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला.
घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा करून मृतदेह अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला, तर गंभीर जखमी साबिर खान याच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून भरधाव वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. या अपघातांमध्ये अनेकांचे बळी देखील गेले. अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने वेळीच पावले उचलून तात्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.