चंद्रपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एम.आय.डी.सी.) परिसरात असलेले बंद कारखाने असामाजिक तत्त्वांचे अड्डा बनले आहेत. या बंद कारखान्यांत असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला असून त्याचा वापर समाजविघातक कृत्यांसाठी होत आहे. अशा बंद कारखान्यांची यादी तयार करून पोलिसांच्या सहकार्याने तेथे तपासणी करावी आणि येथून अंमली पदार्थांचा पुरवठा जिल्ह्यात होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी तसेच त्याची विक्री व वाहतूक प्रतिबंधाबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संबंधित यंत्रणेची आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, उपविभागीय अधिकारी संजय पवार, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे विजयकुमार, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, टपाल खात्याचे उपविभागीय निरीक्षक एम.एम. चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथ) आश्विनी सोनवणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी गौडा यांनी अंमली पदार्थविरोधी कार्यवाहीचा नियमित आढावा, पोलीस विभाग तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेली कारवाई, एन.डी.पी.एस. अंतर्गत अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, आदी विषयांवर चर्चा केली.

हेही वाचा – ‘एमपीएससी’ पदभरतीत मराठा आरक्षण लागू; २५० जागांची वाढ करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एम.आय.डी.सी.) परिसरात असलेल्या बंद कारखान्यांचा वापर अवैध व्यवसायासाठी होत असल्याची चर्चा आहे. हे बंद कारखाने असामाजिक तत्त्वांचा अड्डा बनले आहेत. अशा बंद कारखान्यांची यादी तयार करून तेथे पोलिसांच्या सहकार्याने तपासणी करावी. जेणेकरून अशा बंद कारखान्यांचा उपयोग असामाजिक घटकांसाठी होणार नाही. याबाबत सक्तीने उपाययोजना कराव्या, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

शिक्षण विभागाने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ प्रतिबंधबाबत जनजागृती करावी. या पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी पुढील शैक्षणिक सत्रापासूनच वर्षभराचे नियोजन करावे. जनजागृती, पथनाट्य, फेरी, आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना याबाबत अवगत करणे तसेच वाहतुकीचे नियम, आरोग्यबाबत मार्गदर्शन, तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम, आदी बाबी समजावून सांगाव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

हेही वाचा – नागपूर शहरबसची चर्चा सेवेपेक्षा गैरव्यवस्थापनांसाठीच अधिक

निर्देश काय?

  • कृषी विभागाने शेतशिवाराच्या नावाखाली गांजा, खसखस व इतर अंमली पदार्थ वनस्पतींची लागवड होत असल्यास संबंधित कृषी सहायक, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांना अवगत करावे.
  • टपाल खात्याने जिल्ह्यात येणाऱ्या ‘पार्सल’चे स्कॅनिंग करावे.
  • अंमली पदार्थाची लागवड, वाहतूक व विक्री होत असल्यास याबाबतची माहिती ‘वंदे मातरम् चांदा’ या तक्रार प्रणालीच्या ‘टोल फ्री’ क्रमांकावर तत्काळ द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गौडा यांनी केले आहे.