Chandrapur Tiger Attack News : चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाला असून वाघाच्या हल्ल्यात बळी जाणाऱ्या गावकऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. या सतत होणाऱ्या हल्ल्यानंतर वनखाते देखील हतबल झाले आहे. दरम्यान, तळोधी परिसरात हल्ला करणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले आहे.
वनखात्याच्या चमुसह पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, शूटर अजय मराठे यांनी आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास मानव-वन्यजीव संघर्ष असलेल्या तळोधी वनक्षेत्रातून बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. या वाघिणीला नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात आणण्यात येणार आहे.
नागभीड तालुक्यातील तळोधी बा वनपरिक्षेत्रातील आलेवाही बीटमधील कक्ष क्रमांक ६९७ मध्ये (तलाव परिसरात) रविवारी वाढोणा येथील मारोती नकडू शेंडे हा इसम आपली पत्नी व अन्य नागरिकांसह सकाळी तेंदूपत्ता तोडण्यासाठी सकाळी गेला होता. तलाव परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याचेवर मागून हल्ला केला. हल्ला होताच त्यांनी आरडाओरडा केली. परिसरातील लोकं वाचविण्यासाठी धावून आले. त्यामुळे वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. परंतु, वाघाच्या हल्ल्यात सदर इसम गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती गावात होताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. लगेच वन विभागाला माहिती देण्यात आली. वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गंभीर जखमी इसमाला तातडीने वाढोणा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्राथमिक उपचार करून सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, गंभीर जखमी शेंडे यांचा मृत्यू झाला.
गेल्या दहा मे पासून रविवारपर्यंत एकूण आठ जणांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सहा महिलांचा समावेश आहे. दहा मे रोजी सिंदेवाही तालुक्यातील मेंढामाल गावातील सारिका शालीक शेंडे ( वय ५५), कांता बुद्धाची चौधरी (६०), शुभांगी मनोज चौधरी (३१) या तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तीन महिलांचा मृत्यू झाला. ११ मे रोजी मूल तालुक्यातील नागाळा गावातील विमल बुद्धाजी शेंडे ही महिला चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील ५३७ कंपार्टमेंटमध्ये तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेली असता वाघाच्या वाघाच्या हल्ल्यात ठार झाली.
१२ मे रोजी मूल तालुक्यात वडीलांकडे राहत असलेल्या भादुर्णा येथील भूमिका दिपक भेंडारे हिचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. १४ मे ला चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरीक्षेत्रामधील करबडा येथे कचराबाई अरुण भरडे (५४) ही महिला तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेली होती. वाघाने तिला ठार केले. रविवार १८ मे ला नागभीड व मूल तालुक्यात दोघांचा वाघाने बळी घेतला. त्यामध्ये नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील मारोती नकडू शेंडे (६४) हा इसम तेंदुपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेला होता. वाघाने त्याला ठार केले. मूल तालुक्यातील भादुर्णी येथील ऋषी झुगांजी पेंदोर (७०) हा जंगलात बकऱ्या चरण्यासाठी गेला होता. वाघाने त्याला ठार करून शरीराचे पूर्ण अवयव खाल्ले आहे.