चंद्रपूर : बौद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्री ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात होणाऱ्या व्याघ्रगणना कार्यक्रमात ८१ मचाणीवर १६२ पर्यटक सहभागी झाले आहेत. कोर झोन मध्ये वन अधिकारीच गणना करणार आहे.

ताडोबा व्यवस्थापनाने पंधरा दिवसापूर्वी पासून याची तयारी सुरू केली होती. यासाठी बफर क्षेत्रातील ८१ मचाणी सज्ज करण्यात आल्या असून ६ वनपरिक्षेत्रात ही गणना होत आहे. यामध्ये मोहरली, मूल, चंद्रपूर, शिवणी, पळसगाव आणि खडसंगी वनपरिक्षेत्रांचा समावेश आहे. एका मचाणीवर दोन पर्यटक आणि एक गाईड अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मचाणीचा अनुभव घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा करण्यात आली होती. त्यानुसार १६२ पर्यटकांची निवड करण्यात आली. पर्यटकांना सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत वनविभागाच्या मदतीने १६ प्रवेशद्वारांवरून मचाणीवर पोचवले आहे.

यापूर्वी ताडोबात बफर आणि कोअर या दोन्ही क्षेत्रात व्याघ्रगणना केली जायची. मात्र, २०१७ मध्ये वनमजूरावर हल्ला करून वाघाने ठार केल्यानंतर सामान्य नागरिकांसाठी कोअर क्षेत्र बंद करण्यात आले. यावर्षी कोअर क्षेत्रात ९५ मचाणी उभारण्यात आल्या असून यावरुन वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी निरीक्षण करणार आहेत. यामध्ये १८३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पूर्वी व्याघ्रगणाना प्रक्रिया सामान्य नागरिकांसाठी निःशुल्क होती. मात्र काही वर्षांपासून यावर आता शुल्क आकारण्यात येत आहे. त्यातही हा मचाणीचा अनुभव ताडोबा व्याघ्रप्रकल्पात सर्वाधिक महागडा आहे.यासाठी प्रति व्यक्ती साडे चार हजार शुल्क आकारण्यात येत आहे.त्यामुळे सामान्य नागरिकांसाठी हे परवडण्यासारखे नाही.शिवाय स्थानिक नागरिकांना देखील यात कुठलीही सूट नाही. याबाबत ताडोबा व्यवस्थापनाकडून हे दर वाजवी असल्याचे सांगण्यात येत आहे. येणाऱ्या पर्यटकांना येजा करण्यासाठी वाहनांचा उपयोग होतो, त्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा देण्यात येतात त्यामुळे हा शुल्क आकारण्यात येतो. शिवाय गाईड असल्यामुळे वन्यजीवांबाबत त्यांना इत्यंभूत माहिती मिळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बौद्ध पौर्णिमेनिमित्त व्याघ्रगणनेला महत्व

बौद्ध पौर्णिमेला रात्रीचा प्रकाश हा सर्वाधिक असतो. या स्वच्छ प्रकाशात पाणवठ्यावर येणारे प्राणी सहज बघितले जाऊ शकतात. इंग्रजकालीन काळात व्याघ्रगणनेसाठी या पद्धतीचा उपयोग केला जायचा. सायंकाळपासून सकाळपर्यंत मचाणीवर बसून पाणवठ्यावर आलेले प्राणी आणि त्यांची संख्या आणि या प्राण्यांची विशेष ओळख टिपून त्यांची नोंद केली जाते. यातून या जंगल परिसरात नेमके किती वाघ आणि इतर प्राणी आहेत, एखाद्या दुर्मिळ प्राण्याचे अस्तित्व येथे आहे का याची माहिती होण्यास ही व्याघ्रगणना अत्यंत महत्वाची समजली जायची. मात्र, ही पद्धत तितकी तंत्रशुद्ध नव्हती. शिवाय यात अनेक त्रुटी होत्या. आता व्याघ्रगणनेसाठी जीपीएस, ट्रॅप कॅमेरे, वाघाचे ठसे अशा आधुनिक आणि अद्यावत प्रणालीचा उपयोग करून ही प्रक्रिया केली जाते. मात्र असे असतानाही सामान्य नागरिकांना याचा अनुभव घेता यावा यासाठी अजूनही ही पारंपरिक पद्धत सुरू ठेवण्यात आली आहे.