नागपूर : न्या. भूषण रामकृष्ण गवई १४ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत. २००७ मध्ये सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणारी न्या. के. जी. बालाकृष्णन यांच्यानंतर न्या. गवई ही दुसरी दलित व्यक्ती ठरणार आहेत. न्या. गवई यांचा प्रवास अमरावतीच्या गल्लीतून सुरू झाला आणि पुढे ते नागपूरमार्गे दिल्लीपर्यंत पोहोचले.

न्या. गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावतीमध्ये झाला. त्यांचे वडील रामकृष्ण सूर्यभान गवई आंबेडकरी चळवळीच्या प्रमुख नेत्यांपैकी होते. त्यांनी अमरावतीचे खासदारपद व पुढे बिहार, सिक्कीम आणि केरळचे राज्यपालपद भूषवले. भूषण गवई तीन भावंडांपैकी ज्येष्ठ होते. वडील राजकारण, समाजकारणात सक्रिय असल्याने बालपणापासूनच त्यांना सामाजिक कार्याचा वारसा लाभला.

वडील सातत्याने कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांचे संगोपन आई कमला गवई यांनी केले. कमलाताई न्या. गवई यांच्या बालपणाची आठवण सांगतात, घरातील ज्येष्ठ मुलगा असल्याने तो लहान वयातच परिपक्व झाला. १९७१ मध्ये झालेल्या भारत-बांगलादेश युद्धादरम्यान अमरावतीच्या फ्रेजारपुरा भागात सैनिकांसाठी भूषण भाकरी बनवायला मदत करत होता. ‘मेरे बच्चे तो मुकद्दर का सिकंदर बनना ही चाहिये ना’, अशा अभिमानास्पद शैलीत त्यांनी मुलाचे कौतुक केले.

उच्च न्यायालयातील आठवणी…

●बी.कॉम.ची पदवी प्राप्त केल्यावर गवई यांनी विधि अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. १९८५ साली वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांनी वकिली सुरू केली. काही काळ मुंबई येथे काम केल्यावर त्यांनी नागपूरकडे मोर्चा वळवला.

●उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुरुवातीला अतिरिक्त सहायक वकील म्हणून आणि नंतर मुख्य सरकारी वकील म्हणून कार्य केले. स्वत:च्या मर्जीने सरकारी वकिलांचा चमू निवडणार या अटीवर त्यांनी मुख्य सरकारी वकिलाचे पद स्वीकारले.

●सध्या उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत न्या. भारती डांगरे आणि न्या. अनिल किलोर याच चमूतील सदस्य होते. त्या काळातील एक आठवण ताजी करताना न्या. किलोर सांगतात की, एकदा राज्याच्या मुख्य सचिवांनी गवई यांच्या चमूतील एका वकिलाला काढण्याचे निर्देश दिले होते. मात्र गवई यांनी चमूतील सदस्याची बाजू घेतली आणि त्याला काढायचे असेल तर आधी मला काढा, अशा शब्दात ठणकावले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

●नागपूर खंडपीठात सध्या प्रशासकीय न्यायमूर्ती म्हणून कार्यरत न्या. नितीन सांबरे म्हणाले, गवई हे सामान्य नागरिकांची संवेदना समजणारे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांना सामान्य माणसांच्या समस्या कळतात. गवई यांना एकदा घर विकत घ्यायचे होते. यासाठी त्यांनी स्वत:ची चारचाकी विकली आणि सुमारे वर्षभर आपल्या दुचाकीने न्यायालयात आले.