नागपूर : जल, जंगल आणि जमीन हा देशाचे मुल निवासी असलेल्या आदिवासींचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे त्यांना हक्काच्या जमिनीचा पट्टा बहाल करण्यास सरकार कटिबद्ध आहे. सरकार त्याचे कसोशिने पालनही करत आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिली.
आदिवासी विकास विभागाच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती आणि जनजातीय गौरव वर्षांतर्गत १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान मानकापूर विभागीय क्रीडा संकुलात राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्याचे औपचारिक उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके, विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव राजेश कुमार, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते.
देशातील आदिवासी जननायकांचे चरित्र जनतेसमोर आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे नमूद करीत मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील आदिवासी आश्रम शाळांचा दर्जा सुधारून आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी स्वयम् योजना राबविली जात आहे. एकही आदिवासी मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये. यासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे. राणी दुर्गावती सक्षमीकरण योजनेद्वारे दीड लाख आदिवासी महिलांना पन्नास हजार ते दीड लाखांपर्यंत मदत केली जात आहे. त्यामुळे आदिवासी महिला समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत.
देशातील ५ हजार आदिवासी पाडे ‘धरती आबा’शी संलग्न
राज्यात धरती आबा कार्यक्रम राबविण्यासाठी १७ मंत्रालयांच्या २५ योजना एकत्र करून ३२ जिल्ह्यातील ५ हजार गावांतील प्रत्येक आदिवासी पाड्यांवर रस्ते, पाणी, वीज, रोजगार आणि महिला विकासाच्या योजना पोचविल्या जात आहेत. आश्रमशाळांचे डिजिटायजेशन झाले आहे. ३७ एकलव्य शाळांतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके यांनी आदिवासी योजना आणि कल्याणावर प्रकाश टाकला.
आदिवासींना हवी समान संधी
देशाच्या विकासात आदिवासींचे मोठे योगदान मोठे आहे, असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, भगवान बिरसा मुंडा हे अभिमान व स्वाभिमानाचे प्रतिक आहे. आदिवासींना योग्य संधीची गज आहे. म्हणूनच हस्तउद्योग, कुटीर उद्योगाच्या माध्यमातून व आदिवासी विकासाच्या योजना तळागाळात राबविणे आवश्यक आरहे. आदिवासींच्या आर्थिक प्रगतीचे नवे मॉडेल आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे.
ऑनलाइन भूमिपूजन व लोकार्पण
सुराबर्डी गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण उपकेंद्राचे भूमिपूजन, घानवळ शासकीय आश्रमशाळा, जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प लोकार्पण, पळसुंडा शासकीय आश्रमशाळा, पालघर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प प्रयोगशाळा इमारतीचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. आदिवासी विभागातर्फे आयोजित विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तत्पूर्वी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित चित्रमय पुस्तक आणि ‘आदिवासी परंपरा व सर्जनशिलतेवर आधारित कॉफीटेबल बुकचे प्रकाशन झाले. आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी प्रास्ताविक केले तर आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांनी आभार मानले.
