नागपूर: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोटाळ्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावर निवडणूक आयोगाने व भाजपकडून खोटे आरोप असल्याचा दावा होत आहे. त्यातच राहुल गांधींनी सांगितलेल्या महाराष्ट्रातील कामठी विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या घोटाळ्यावर येथील मविआचे उमेदवार सुरेश भोयर यांनी बनावट मतदाराचा दावा करत आकडेवारीच सादर केली.
नागपुरातील प्रेस क्लबमध्ये सोमवारी झालेल्या पत्रपरिषदेत सुरेश भोयर पुढे म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत निवडणूक आयोगाने मोठ्या प्रमाणात मतदार यादीत गैरप्रकार केल्याचे वास्तव पुढे आणले. त्यात ऑनलाईनच्या नावावर मोठ्या प्रमाणात कोणत्याही प्रकारची कागदपत्रे न पाहता मतदारांची नावे समाविष्ट करण्याच्या गैर कृत्याच्याही समावेश होता. कामठीतील ३५ हजार मतदार वाढल्याचाही घोळही पुढे आणले गेले. राहुल गांधीचे सर्व आरोप खरे आहे, असे भोयर म्हणाले.
कामठी मतदार संघात काँग्रेस पक्षाचा व मविआचा मी उमेदवार होतो. येथे लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये ४ लाख ६६ हजार २३१ मतदार होते. त्यानंतर ६ महिण्याने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत येथील मतदारांची संख्या थेट ५ लाख १ हजार ७७० मतदारांवर पोहचली. या काळात अचानक येथे किती नवीन घरे बांधण्यासह लोकांचे स्थलांतर झाले की मतदार ३५ हजार ५३९ ने वाढले, हे कळायला मार्ग नसल्याचेही भोयर म्हणाले. २९ ऑक्टोंबर २०२४ रोजी नागपूरचे जिल्हाधिकाऱ्यांनी कामठी विधानसभेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. तेव्हा कामठी मतदार संघातील मतदार संख्या २३ हजारांनी वाढून ४ लाख ८८ हजार दाखवली गेली. त्यानंतर निवडणूकीची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर ऑनलाईन प्रसिद्धीने ३० ऑक्टोंबर २०२४ ते मतदानाच्या ३ दिवसाअगोदर पर्यंत येथे तब्बल १२ हजारावर मतदार वाढले. . म्हणजे १५ दिवसात १२ हजार मतदार नोंदणी निवडणूक आयोगाने कशी केली, हे कळायला मार्ग नाही.
दरम्यान ही नोंदणी करतांना कोणतेही कागदपत्र त्यांच्याकडे नाही. आम्ही माहितीच्या अधिकार तर्फे त्यांना विचारणा केल्यावर ही माहिती दिली जात नाही. या नोंदणी फक्त आधार कार्डच्या मदतीने केली गेली. त्यात इतर एकही ओळख पत्र नसून सगळा गैरप्रकार उघडकीस येईल म्हणून निवडणूक आयोग खोटी माहिती प्रसिद्धीमाध्यमांपुढे देत असल्याचेही भोयर यांनी सांगितले.
नवीन मतदारांची माहिती गावकऱ्यांना नाही
संपूर्ण कामठी मतदार संघात ३५ हजार नवीन मतदार बोगस नोंदणी करण्यात आली. यातील अनेक मतदार कामगार वर्ग, मध्यप्रदेश व इतर राज्यातील मतदार नोंदणी केलेले दिसत आहे. दरम्यान या नवीन मतदारांचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना गावकरी ओळखतही नसून त्यांचा गावाशी कोणता संबंधही नाही. हे गावात नसलेल्या नवीन मतदारांकडून मात्र सर्वाधिक मतदान झाल्याचे निदर्शनात येत असल्याचाही आरोप सुरेश भोयर यांनी केला.