अकोला : शालेय पोषण आहारातील मसाल्याच्या पाकिटामध्ये चक्क मेलेली पाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात घडला आहे. चिमुकल्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू असून वेळीच हा प्रकार लक्षात आला म्हणून मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी शिक्षण विभागाने चौकशी सुरू केली. संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली जात आहे.  

अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यात येणाऱ्या तळेगाव येथील वरिष्ठ प्राथमिक जिल्हा परिषद शाळेमध्ये गुरुवारी दुपारी शालेय पोषण आजार बनविण्याचे काम सुरू होते. यावेळी मदतनीस यांनी शालेय पोषण आहारातील खिचडी बनविण्यासाठी कांदा-लसून मसाल्याचे पाकीट फोडले. या पाकिटातील मसाला पाहताच मदतनीस यांना मोठा धक्काच बसला.

हेही वाचा >>> देशात दरवर्षी अपघातांमध्‍ये दीड लाख बळी; गडकरी म्हणतात, “पेट्रोल, डिझेलला हद्दपार…”

त्या मसाल्याच्या पाकिटामध्ये मेलेल्या अवस्थेतील पाल आढळून आली. त्यांनी तात्काळ याची माहिती मुख्याध्यापकांना दिली. मुख्याध्यापकांनी घडलेला प्रकार गटशिक्षणाधिकाऱ्यांना कळवला. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेत धाव घेऊन पंचनाम केला.

या प्रकरणी शिक्षण विभागाकडून वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शालेय पोषण आहाराच्या पुरवठाधाराचा करारनामा पुणे येथील शिक्षण संचालकांनी केला आहे. या प्रकरणी पुढील चौकशीची प्रक्रिया सुरू असून शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>> शिवरायांचा पुतळा पाडला?…. ज्यांनी हे काम….प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यामुळे….

दरम्यान, मृत पाल आढळल्याचा मुद्दा अकोला जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेत देखील उपस्थित करण्यात आला. वंचितचे सदस्य राम गव्हाणकर यांनी हा मुद्दा मांडला. जिल्ह्यात शालेय पोषण आहाराचा केलेला पुरवठा परत बोलावून घ्या आणि तात्काळ शालेय पोषण आहार थांबवण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणात चौकशी केली जात असल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सभागृहात सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोषण आहार पोषक की घातक?  शासनाकडून विद्यार्थ्यांच्या हितासाठी शालेय पोषण आहार योजना राबवली जाते. मात्र, ही योजना राबवतांना प्रचंड हलगर्जीपणा होत असल्याचे विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार पोषक की घातक? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या योजनेसाठी पुरवठा केला जाणारा आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप नेहमीच होतो. आता त्या आहारातच पाल, साप, उंदिर आढळून येत असल्याचे धक्कादायक प्रकार राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून सातत्याने समोर येत आहेत. पोषण आहाराच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी अक्षरश: खेळखंडोबा सुरू आहे.