नागपूर जिल्ह्य़ात आज, शनिवारी दुपारी वेगवेगळ्या दोन ठिकाणी वीज कोसळून ४ जणांचा मृत्यू झाला, तर ६ मजूर जखमी झाले. एका घटनेत तिघांचा, तर दुसऱ्या घटनेत एकाचा मृत्यू झाला. परभणी जिल्ह्य़ात शनिवारी चार महिलांचा मृत्यू झाला.
जलालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकी शिवारात शेतात काम सुरू असताना पाऊस सुरू झाल्याने मजुरांनी शेतातील झोपडीत आश्रय घेतला. यवतमाळ जिल्ह्य़ात घाटंजी तालुक्यात इंजाळा दत्तापूर, बेलोरा, किन्ही शिवारात आज, शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास वीज कोसळून दोन विद्यार्थ्यांसह तिघांचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी झाले.
रब्बीला पूरक
ऐन हंगामात बहुतांश काळ पावसाने हुलकावणी दिल्यानंतर आता राज्याच्या काही वादळी पाऊस बरसत आहे. काही ठिकाणी सलग तिसऱ्या-चौथ्या दिवशी अशा पावसाने हजेरी लावल्याने तेथे चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे, तर रब्बीच्या हंगामासाठी पूरक परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारीही मध्य महाराष्ट्र व मराठवाडा येथे काही ठिकाणी अशा पावसाने हजेरी लावली.
आजही पावसाची शक्यता
राज्याच्या काही भागात रविवारीसुद्धा वादळी पावसाची शक्यता आहे. त्याची तीव्रता शनिवारइतकी नसेल असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.