महेश बोकडे

नागपूर : कोराडीत प्रस्तावित महानिर्मितीच्या नवीन प्रकल्पाला जनसुनावणीत पर्यावरणवाद्यांनी कडाडून विरोध केला. परंतु महानिर्मितीसह ऊर्जा खात्याने प्रकल्पाच्या बाजूने मत नोंदवले. या प्रकल्पाचा निर्णय अद्याप व्हायचा असतानाच १९ जुलैला खापरखेडातील राख बंधारा फुटला. त्यामुळे पर्यावरणवादी पुन्हा संतप्त झाले असून त्यांनी कोराडीतील नवीन प्रकल्पाला विरोध केला आहे.

कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पाचा राख बंधारा गेल्यावर्षी जुलैमध्ये फुटला होता. त्यानंतर येथील राखमिश्रित पाणी परिसरातील शेतांसह जवळच्या नदीतून नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचले. आता पुन्हा १९ जुलै २०२३ रोजी पावसामुळे खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचा राख बंधारा फुटून राखमिश्रित पाणी परिसरातील शेतीत शिरले.

हेही वाचा >>>बुलढाणा: जैन समाजाचा चिखलीत मूक मोर्चा

खापरखेडा राख बंधाऱ्यातील पाणी कन्हान नदीत शिरल्याचा पर्यावरणवाद्यांचा आरोप आहे. परंतु फिल्टर लावल्याने राख नदीत गेली नसल्याचा दावा महानिर्मिती करीत आहे. कोराडी-खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील राखेत किरणोत्सर्गाचे प्रमाण आढळल्याने या घटनांमुळे स्थानिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. वारंवार हे बंधारे फुटण्याला येथील निकृष्ट कामासह निकषानुसार एकाही बंधाऱ्याचे काम न करणे, हे एक कारण असल्याचेही पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>>कारधा पुलावर लागले कायमस्वरूपी बॅरिकेटस्; ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्यावरणवाद्यांचे म्हणणे काय?

कोराडी आणि खापरखेडा औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पातील राखेच्या बंधाऱ्यांमधून झिरपणारे राखमिश्रित पाणी सातत्याने परिसरातील शेतांसह नदीत जाते. बंधाऱ्यामुळे येथील भूजलाचेही पाणी प्रदूषित झाले आहे. सध्या महानिर्मिती सामाजिक दायित्व निधीतून आरओ लावून त्याचे पाणी नागरिकांना देते. महानिर्मितीकडून बंधाऱ्याबाबतचे निकषही पाळले जात नाहीत. त्यात पुन्हा नवीन प्रकल्प उभारून नागरिकांच्या जीवाशी खेळ योग्य नाही, असे मत सेंटर फाॅर सस्टेनेबल डेव्हलेपमेंटच्या संस्थापक लीना बुद्धे यांनी व्यक्त केले. सुधीर पालीवाल म्हणाले, केंद्राच्या धोरणानुसार औष्णिक विद्युत प्रकल्पातील नवीन तयार होणाऱ्या राखेसह जुनी राख संपवण्याची जबाबदारी महानिर्मितीची आहे. परंतु ते होत नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळही काही करत नाही. नवीन प्रकल्प झाल्यास नागपूरसह विदर्भातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे हा प्रकल्पच नको.