लोकसत्ता टीम
नागपूर : प्रत्येक चांगल्या डॉक्टरला मानसशास्त्रीय ज्ञान आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ फिजिशियन डॉ. जय देशमुख यांनी केले. नागपुरातील आयएमए सभागृहात झालेल्या दैनंदिन जिवनातील मानसशास्त्रीय आधारावरील कार्यशाळेत ते बोलत होते.
याप्रसंगी प्रामुख्याने मंचावर ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. के. के. सचदेव, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. वंदना काटे, सायकियाट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. निखील पांडे, सचिव डॉ. अभिषेक मामर्डे, डॉ. रजनी मंडलीक उपस्थित होते. डॉ. जय देशमुख पुढे म्हणाले, डॉक्टरांकडे एखादा रुग्ण दुखने घेऊन आल्यास त्याला ते शारिरिक वा मानसिक समस्येमुळे असू शकते. त्यामुळे डॉक्टरांना वैद्यकीय ज्ञानासोबतच मानसशास्त्रियही ज्ञान आवश्यक आहे. त्यातून तो रुग्णाच्या आजाराचे अचूक निदान करू शकतो. सोबत मानसशास्त्र तज्ज्ञ डॉक्टरांनाही वैद्यकीय औषधींचे ज्ञान आवश्यक आहे. जेणेकरून तो मानसिक आजाराची समस्या घेऊन आल्यास वैद्यकीय उपचार करू शकतो.
आणखी वाचा-आई- बाबांच्या वागणुकीचा मुलांवर होतो परिणाम- डॉ. अभिषेक सोमाणींचे मत
डॉ. के. के. सचदेव म्हणाले, आम्ही मानसोपचार विषयावर रुग्णांवर उपचार सुरू केला तेव्हा या विषयाला जास्त महत्व नव्हते. आम्हाला एखाद्या रुग्णालयात शेवटची खोली दिली जात होती. परंतु, आता स्थिरी बदलत आहे. आता मानसोपचाराला खूप महत्व आले आहे. त्यामुळे मुलांमधील बदलासह घरातील लहान- लहान मानसिक विषयावर नागरिक वेळीच मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचाराला येतात. त्यातून भविष्यातील गंभीर मानसिक आजारही टाळणे शक्य असल्याचे डॉ. सचदेव म्हणाले. डॉ. सुधीर भावे म्हणाले, शारीरिक वोदना दोन प्रकारच्या असतात. त्यापैकी एक शरिराला इजा वा आजारामुळे तर दुसरी मानसिक आजारामुळेही असते. त्यामुळे रुग्णाच्या आजाराचे वेळीच निदान करून योग्य उपचार हवा. सोबत एखाद्या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास रुग्ण स्वावलंबी होऊन लवकर बरा होत असल्याचेही विविध निरीक्षणात पुढे आल्याचेही डॉ. भावे म्हणाले. डॉ. वंदना काटे, डॉ. निखील पांडे, डॉ. अभिषेक मामर्डे यांनीही आपले मत मांडले.